जुन्या वादाचा राग मनात धरून ३५ वर्षीय पैलवानाची सांगलीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कार्वे येथील स्मशानभूमीलगतच्या विटा-तासगाव रस्त्यावरील पुलावर मध्यरात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. राहुल गणपती जाधव असे मृत पैलवानाचे नाव आहे. याप्रकरणी माणिक परीट, गजानन शिंदे व नयन धाबी यांना अटक करण्यात आली आहे. मृत राहुल जाधव व संशयित आरोपींमध्ये एका प्रकरणात जुना वाद होता. या वादाच्या रागातून त्यांनी राहुल जाधवचा काटा काढण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री राहुल यांच्या कारचा पाठलाग करत त्यांना अडवले. त्यानंतर तलवार व गुप्तीचे वार करून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी राजाराम गणपती जाधव यांनी विटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल जाधव यांचे विटा एमआयडीसी भागातील कार्वे हद्दीत हॉटेल व बार आहे. सकाळी नऊच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे आपल्या हॉटेलवर गेले होते. त्यानंतर मध्यरात्री ते घराच्या दिशेने निघाले होते. त्या वेळी त्यांच्या हॉटेलचा व्यवस्थापक भारत भोसले यांनी राहुलचा भाऊ राजाराम यांना फोन करून राहुलचा घातपात झाल्याची माहिती दिली. ते तातडीने कार्वे ते तासगाव रस्त्यालगत कार्वे हद्दीतील स्मशानभूमीलगत पोहोचले. तिथे रस्त्यावर राहुल हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या अंगावर व डोक्यावर तलवारीचे अनेक वार करण्यात आले होते. तसेच त्यांची कारही फोडण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याचे सांगण्यात आले आहे. जुन्या प्रकरणात घरात घुसून महिलेवर हल्ला गोकुळनगर परिसरात जुन्या गुन्ह्याच्या रागातून एका महिलेवर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. मधू लखन इसरडे (३८, रा. सांगली) असे महिलेचे नाव आहे. जखमी महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/pyAY7lx
सांगलीत जुन्या वादातून पैलवानाची निर्घृण हत्या:पोलिसांकडून तिघांना अटक, तलवारीने केले वार
January 17, 2025
0