Type Here to Get Search Results !

औरंगजेबाची कबर खुलताबादलाच का?:मातीच्या साध्या कबरीमुळे राज्याच्या शांततेची माती कशी झाली? अखेर कसे गेले औरंगजेबाचे अखेरचे दिवस?

औरंगजेबाच्या कबरीमुळे अवघ्या महाराष्ट्राची शांतता भंग पावली आहे. राज्याचे मत्सोद्योग व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी सर्वप्रथम औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली. त्यानंतर एकच कहर झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी थेट औरंगजेबाची कबरच हटवण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी राज्यभर आंदोलन केले. त्याचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले. तिथे मोठी जाळपोळ झाली. संचारबंदी लावण्याची वेळ आली. चला तर मग या वादाच्या निमित्ताने औरंगजेबाची कबर औरंगाबादच्या खुलताबादमध्येच का बांधण्यात आली? तथा त्याच्या मातीच्या साध्या कबरीमुळे राज्याच्या शांततेची माती कशी झाली? याचा धुंडाळा घेऊया... सर्वप्रथम पाहू काय म्हणाले होते नीतेश राणे? नीतेश राणे औरंगजेबाच्या कबरीविषयी म्हणाले होते, औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर आमच्या सरकारच्या प्रमुखांचीही आमच्यासारखीच मानसिकता आहे. आम्ही तयारीत बसलो आहोत. कबर हटवताना पत्रकारांना सांगणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील अतिक्रमण हटवले तेव्हा आधी आम्ही अतिक्रमण हटवले, त्यानंतर ब्रेकिंग न्यूज दिली. मी हिंदू समाजाल विश्वास देऊ इच्छितो की, औरंगजेबाच्या कबरीचाही करेक्ट कार्यक्रम होईल. जरुर होईल. जे निश्चित झाले आहे ते नक्की होईल. सरकारकडे 5 वर्षे आहेत. आता तर आम्ही पिचवर आहोत. सेंच्युरी मारायची आहे. मी असे ऐकले आहे की, औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जितकी सुरक्षा वाढवण्यात येईल तितकी त्या कबरीचा कार्यक्रम करण्यात मजा येईल. आमचे पत्रकार मित्र विचारतात की, नीतेशजी कबर कधी काढणार? पण ती कबर काढताना तुम्हाला सांगणार नाही. हे काय बाळाचे बारसे आहे का? तुम्हाला त्याचे नाव ठेवण्यासाठी बोलवायला? आम्ही शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील अतिक्रमण हटवले तेव्हा पत्रकारांना सकाळी 5 वा. कॅमेरा घेऊन या असे सांगितले का? नाही सांगतले ना. आम्ही आधी तोडले, मग तुम्हाला ब्रेकिंग न्यूज दिली. हे लक्षात ठेवा. इथे स्वराज्य रक्षक शिवाजी महाराजांच्या आठवणी हव्यात, स्वराज्याचे विचार महाराष्ट्रात हवेत. आम्हाला अशी घाण नको, औरंगजेब टीपू सुल्तान सारखी घाण नको, असे ते म्हणाले. आता पाहू काय म्हणाले होते अबू आझमी? नीतेश राणे यांच्या या विधानाने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबातील युद्ध धर्माचे नव्हे असा वादग्रस्त दावा केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी औरंगजेबाच्या काळात भारताला 'सोने की चिडिया' म्हटले जात होते असा दावा करून आगीत आणखी तेल ओतण्याचे काम केले. अबू आझमी म्हणाले होते की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान व बर्मापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी 24 टक्के होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटले जायचे. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती असे जर कुणी म्हणत असेल, तर मी ते मानत नाही. अबू आझमी यांच्या या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झाला. त्यांच्यावर चौफेर टीका झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत थेट अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. ती पूर्ण करण्यात आली. त्यानंतर अबू आझमी यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला. ते म्हणाले, माझे विधान मोडतोड करून दाखवण्यात आले. औरंगजेबाविषयी मी केलेले विधान इतिहासकारांच्या मतांवर आधारित आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कोणत्याही महापुरुषाविषयी कोणत्याही प्रकारचे अपमानकारक विधान केले नाही. त्यानंतरही माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. माझ्या वक्तव्याला सध्या राजकीय वळ दिले जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन तहकूब होणे राज्यातील जनतेच्या हिताचे नाही. यामुळे जनतेचेच नुकसान होत आहे, असे ते म्हणाले. अबू आझमीच्या विधानाने हिंदुत्त्ववाद्यांना जोर अबू आझमी यांनी माफी मागितल्यानंतरही हे प्रकरण निवळले नाही. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी राज्यभर रान पेटवले. त्यांनी सोमवारी 17 मार्च रोजी राज्यभर निदर्शने केली. त्यात नागपूर येथे औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन केले. पण यावेळी जाळण्यात आलेल्या कापडावर पवित्र कुराणातील काही ओळी असल्याची अफवा पसरली व नागपुरात जे घडायचे नव्हते ते घडले. तिथे प्रचंड दंगल घडली. आता थोडेसे इतिहासात डोकवूया... औरंगजेबाच्या विषयाकडे वळताना प्रथम तो महाराष्ट्रात कसा आला हे पाहणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे सर्वप्रथम त्याची पार्श्वभूमी पाहूया... डॉक्टर दीपा सावळे यांच्या 'मुघलकालीन भारताचा इतिहास' या पुस्तकानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी 1680 मध्ये स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याला राजाश्रय दिला. यामुळे बादशहा औरंगजेब दक्षिण भारतात उतरला. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत त्याची दक्षिणेत येण्याची हिंमत झाली नव्हती. त्याने विजापूर व गोवळकोंडा ही राज्ये जिंकल्यानंतर आपली पूर्ण ताकद मराठ्यांकडे वळवली. संभाजीराजे यांनी त्याचा निकराचा प्रतिकार केला. पण मुघल सरकार शेख निझाम याने फेब्रुवारी 1689 मध्ये विशालगडावरून रायगडाला जाताना संगमेश्वर येथे संभाजीराजे व कवी कलश यांना कैद केले. औरंगजेबाने या दोघांनाही 11 मार्च 1989 रोजी भीमेकाठी कोरेगाव येथे हाल - हाल करून ठार केले. संभाजी महाराजांच्या मृत्युमुळे आपली दक्षिणेतील मोहीम फत्ते झाल्याचा आनंद औरंगजेबाला झाला. पण तो तात्कालिक ठरला. संताजी - धनाजीने झुंजवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचे स्वराज्य बुडवू पाहणाऱ्या औरंगजेबाचा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही भ्रमनिरास झाला. 1689 ते 1707 या प्रदिर्घ काळात मराठ्यांनी आपले स्वराज्य वाचवण्यासाठी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली प्राणपणाने प्रयत्न केला. या काळात संताजी घोरपडे व धनाजी जाधव या मराठा सेनापतींनी मुघलांशी गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले. त्यांच्या या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही. संताजी घोरपडे व धनाजी जाधव या सेनापतींनी केलेला हा संघर्ष इतिहासात मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध या नावाने ओळखला जातो. इसवी सन 1700 मध्ये राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठे महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली लढतच राहिले. त्यामुळे मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करू पाहणाऱ्या औरंगजेबाची महत्त्वकांक्षा महाराष्ट्राच्या भूमीतच धुळीला मिळाली. औरंगजेबाचा मृत्यू कुठे झाला? छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची वीरपत्नी ताराबाई यांच्या प्रेरणेने व नेतृत्वात मराठ्यांनी मुघलांच्या छावण्यांवर धाडी घालून लूट करणे, मध्य भारत, माळवा व गुजरात आदी मुघल प्रांतावर हल्ले करून खंडणी वसूल करणे आदी दहशतीचे उद्योग सुरू केले. औरंगजेबाच्या हयातीतच मराठे हे मुघलांना भारी ठरले होते आणि मुघल त्यांना पराभूत करून त्यांचा बीमोड करू शकत नव्हते हे सिद्ध झाले होते. स्वतः औरंगजेबाला आपण दक्षिणेत 25 वर्षे राहूनही मराठ्यांना संपवू शकत नाही याची जाणीव होवू लागली. त्यातच त्याने दक्षिणेत काढलेल्या सततच्या युद्ध मोहिमांमु्ळे आणि मराठ्यांचा नायनाट करण्याची महत्त्वकांक्षा धुळीला मिळाल्यामळे तो शरीराने खंगला होता. अशा निराश स्थितीत 20 फेब्रुवारी 1707 रोजी त्याचा अहमदनगर येथे मरण पावला. त्यानंतर औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने दौलताबाद जवळच्या खुलताबाद येथे शेख झैनुद्दिन व इतर काही मुस्लिम संतांच्या कबरी असलेल्या परिसरात औरंगजेबाच्या पार्थिव शरीराचे दफन केले. अशा पद्धतीने मराठ्यांचे राज्य नष्ट करू पाहणाऱ्या औरंगजेबाची महत्त्वकांक्षा महाराष्ट्राच्या मातीतच धुळीस मिळाली. संभाजी महाराजांचा पाडाव होईपर्यंत मी हा मुकूट घालणार नाही अशी प्रतिज्ञा करणाऱ्या बादशहाच्या प्रतिज्ञेचा भंग झाला. औरंगजेबाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याच्याकडे सम्राट अशोकालाही जेवढे राज्य लाभले नाही एवढ्या अफाट राज्याचा तो स्वामी झाला होता. पण मराठ्यांनी त्याचा हा डोलारा पोकळ ठरवला. ..मी पापाचे गाठोडे डोक्यावर बांधून नेत आहे असे सांगितले जाते की, औरंगजेबाच्या मृत्युपूर्वी त्याला त्याच्या गुन्ह्यांचा पश्चाताप झाला होता. त्यानुसार, त्याने आपला पुत्र आझमशहा व कामबक्ष यांना पत्र लिहून आपल्या मनातील भावना बोलून दाखवली होती. रामकुमार वर्मा लिखित औरंगजेब्स लास्ट नाईट या पुस्तकात या पत्रातील मजकुराचा उल्लेख आहे. त्यात औरंगजेब म्हणतो, आता मी वृद्ध व अशक्त झालो आहे. मी कोण आहे? मी या जगात का आलो? हे मला माहिती नाही. मी लोकांचे कोणतेही कल्याण केले नाही. माझे आयुष्य असेच वाया गेले. मला भविष्याची आशा नाही. माझा ताप आता निघून गेला आहे. माझ्या शरीरावर केवळ त्वचा आहे. मी या जगात काहीही घेऊन आलो नाही. पण आता पापांचे ओझे घेऊन निघालो आहे. मला माहिती नाही की, अल्लाह मला काय शिक्षा देईल. मी केलेल्या सर्व दुःखाचे, प्रत्येक पापाचे परिणाम मला भोगावे लागतील. डॉक्टर दीपा सावळे, डॉक्टर घनश्याम महाडिक, डॉक्टर किशोरकुमार गव्हाणे लिखित मुघलकालीन भारताचा इतिहास (1526 ते 1707) या पुस्तकातही यासंबंधीचा उल्लेख आला आहे. जीवन क्षणभंगुर आहे. एकदा गमावलेली संधी पुन्हा प्राप्त होत नाही. आयुष्यातील शेकडो संधी मी गमावल्या. भविष्याबद्दल आता मला मुळीच आशा नाही. या जगात येताना मी काही आणले नव्हते. परंतु जाताना मात्र पापांचे गाठोडे डोक्यावर बांधून नेत आहे, असे औरंगजेब या पत्रात म्हणतो. औरंगजेबाची कारकिर्द म्हणजे अपयशाची कहाणी औरंगजेबाने आपल्या स्वकर्तबगारीवर मुघल साम्राज्याचा विस्तार केला. आपल्या कारकिर्दीत पहिली 23 वर्षे उत्तर हिंदुस्तानात आणि पुढील 27 वर्षे दक्षिण भारतात धुमाकूळ घालत होता. अर्तात एवढी वर्षे संघर्ष करूनही तो राजपुतांचा व मराठ्यांचा नायनाट करू शकला नाही. काही इतिहासकार औरंगजेब हा न्यायप्रिय व विद्वान सम्राट होता असे वर्णन करतात. पण त्याने लोककल्याण, आर्थिक व सांस्कृतिक विकास, साहित्य, स्थापत्य, चित्रकला व संगीत आदींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्याच्या प्रचंड साम्राज्य विस्ताराच्या मोहापायी सर यदूनाथ सरकारांनी त्याला अजगराची उपमा दिली व म्हटले की, या अजगराने समोर येईल ते गिळंकृत करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे साम्राज्य स्वतःच इतके बोजड झाले की, ते आपोआपच कोसळले. प्रशासक व राज्यकर्ता या नात्याने तो यशस्वी होऊ शकला नाही. स्टॅन्ले लेनपूल या इतिहासकाराच्या मते, औरंगजेबाने अनेक श्रेष्ठ गुण व चांगले आदर्श बाळगले असले तरी प्रजेचा नेता व राज्यकर्ता म्हणून तो अपयशी ठरला. जनतेच्या हृदयावर तो राज्य करू शकला नाही. थोडक्यात, औरंगजेबाचे साम्राज्य एक खांबी तंबूसारखे राहिले. साहजिकच त्याच्या म-त्यूनंतर हा एक खांबी मुघल साम्राज्याचा डोलारा कोसळून पडला. औरंगजेबाची संपूर्ण कारकीर्द म्हणजे अपयशाची एक कहाणी ठरली. शेवटी पाहू औरंगजेबाची कबर खुलताबादलाच का? औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर जवळच्या भिंगार येथे झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला. कारण, त्याने आपल्या मृत्यूपत्रात तशी इच्छा व्यक्त केली होती. माझ्या मृत्यूनंतर माझी कबर माझे गुरू सय्यद झैनुद्दिन सिराजी यांच्या कबरी शेजारी बांधा, असे तो म्हणाला होता. याविषयी इतिहासकार डॉक्टर दुलारी कुरेशी एकेठिकाणी सांगतात, औरंगजेबाने आपले मृत्यूपत्र तयार केले होते. त्यात त्याने अगदी स्पष्टपणे लिहिले होते की, हजरत ख्वाजा झैनुद्दिन सिराजी हे त्याचे गुरू आहेत. झैनुद्दिन सिराजी हे औरंगजेबाच्या खूप पूर्वी होऊन गेले. पण औरंगजेब वाचन खूप करायचा. त्यात त्याने सिराजी यांना खूप फॉलो केले. त्यानुसार त्याने औरंगजेबाने सांगितले की, माझी कबर सिराजी यांच्या कबरीजवळच बांधायची. ही कबर कशी असावी याची माहितीही औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रात नमूद केले होते. कुरेशी सांगतात, औरंगजेबाने सांगितले होते की, त्याची कबर त्याने जे पैसे कष्टाने कमावलेत त्यातूनच बांधा. जेवढी बांधता येईल तेवढीच बांधा. पण त्यावर एक सब्जाचे छोटेसे रोप लावा. औरंगजेब स्वतः टोप्य विणायचा. त्या विकायचा. तसेच तो कुराण शरीफही लिहायचा. त्यानुसार आझमशहाने औरंगजेबाने कमावलेल्या पैशांतून त्याची खुलताबादेत कबर बांधली. पूर्वी या कबरीच्या वरच्या बाजूला लाकडाचे सुरक्षा कवच बांधण्यात आले होते. पण लॉर्ड कर्झन यांनी 1904-05 साली तिथे मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली. एवढा मोठा बादशहा, पण त्याची कबर एवढी साधी कशी काय? असा प्रश्न त्याने यासंबंधी केला होता. औरंगजेबाच्या कबरीजवळ एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे. तिच्यावर लिहिण्यात आले आहे की, औरंगजेबाचे पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर आहे. औरंगजेबाचा जन्म 1618 तर मृत्यू 1707 मध्ये झाला. औरंगजेब मुघल साम्राजाचा एक ताकदवान बादशहा होता. पण त्याला दख्खनचे स्वप्न पडले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दख्खनात आला. पण त्याला नंतर तेथून बाहेर पडताच आले नाही. तो इथेच सुपूर्द ए खाक झाला...

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/N3R1aUZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.