आपले पूर्वज कोण? असा प्रश्न कुणी आपल्याला केला तर साहजिकच आपण एखाद्या पुरुषाचेच नाव घेतो. एखाद्या महिलेने मोठ्या संकटातून घराला तारून नेले असले तरी पूर्वज म्हणून आपल्या ओठांत तिचे नावही येत नाही. एखाद्या व्यक्तीची पत्नी किंवा अमूक माणसाची मुलगी एवढाच काय तो बाईचा उल्लेख होतो. पण आपल्या समाजाला मोठे करण्यात पुरुषांएवढेच महिलांचेही फार मोठे योगदान आहे. दुर्दैवाने त्यांचा कुठे साधा उल्लेखही होत नाही. त्यांनी केलेले कार्य दुर्लक्षित केले जाते. अशाच आपल्या एक पूर्वज आहेत फातिमा शेख... फातिमा शेख या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका मानल्या जातात, पण आता त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये धुंडाळूया फातिमा यांचा इतिहासातील पाऊलखुणा व याविषयी समर्थक व विरोधकांचे दावे... प्रथम पाहू का उभे टाकले फातिमा शेख यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह? भारताच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या अस्तित्वाविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र सरकारचे माध्यम सल्लागार प्रो. दिलीप मंडल यांनी फातिमा शेख नामक महिला इतिहासात कुठेच अस्तित्वात नव्हती असा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी एवढ्यावरच न थांबता थेट फातिमा शेख नामक काल्पनिक पात्र आपण स्वतः 2006 मध्ये तयार केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फातिमा शेख यांची गत 9 जानेवारी रोजी जयंती साजरी करण्यात आली. याच दिवशी दिलीप मंडल यांनी फातिमा एक कपोलकल्पित पात्र असल्याचा दावा केला. ते आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले, मला माफ करा. खरेतर फातिमा शेख कधीच अस्तित्वात नव्हती. ती ऐतिहासिक पात्र नाही. ती माझी निर्मिती आहे. हा माझा कारनामा आहे. हा माझा गुन्हा म्हणा की चूक म्हणा, पण मी एका विशिष्ट काळात शून्यातून हे पात्र निर्माण केले होते. यासाठी तुम्हाला कुणाला दोष द्यायचा असेल, तर तो मला द्या. आंबेडकरवादी वर्षानुवर्षे याविषयी मला धारेवर धरतात. माननीय अनिता भारती यांच्यापासून डॉक्टर अरविंद कुमार यांच्यापर्यंत सर्वांनी माझ्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मी हे का केले? हे विचारू नका. ती काळाची गरज होती. एक पात्र तयार करायचे होते, जे मी केले. हजारो लोक साक्षीदार आहेत. बहुतांश लोकांनी पहिल्यांदा हे नाव माझ्याकडून ऐकले. एखादी प्रतिमा कशी तयार करायची? हे मला ठावूक आहे. मी या कलेचा मास्टर आहे, म्हणून ते माझ्यासाठी फार कठीण काम नव्हते. मी प्रतिमा निर्मिती करतो. ते माझे कामच आहे, असे दिलीप मंडल यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे दिलीप मंडल यांच्या या खुलाशापर्यंत 9 जानेवारी हा दिवस फातिमा शेख यांची जयंती म्हणून साजरा केला जात होता. पण दिलीप मंडल यांच्या दाव्यानंतर विकीपीडियानेही आपल्या इंग्रजी पेजवरून फातिमा यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी झाल्याचा उल्लेख काढून टाकला. विशेषतः 'द प्रिंट'नेही 9 जानेवारी 2019 रोजी फातिमा शेख यांच्यावर लिहिलेला 'Why Indian history has forgotten Fatima Sheikh but remembers Savitribai Phule' हा लेख आपल्या संकेतस्थळावरून काढून घेतला. पण आता गुगलवर फातिमा यांच्याविषयी असंख्य पेज दिसून येत आहेत. त्यात त्यांच्या अस्तित्वाचे विविध पुरावे दिले जात आहेत. फातिमा अस्तित्वात होत्या असे म्हणण्यास बराच वाव या घटनाक्रमामुळे फातिमा शेख इतिहासात खरेच अस्तित्वात होत्या की त्या केवळ एक काल्पनिक पात्र होत्या? याविषयीची खमंग चर्चा आपल्या देशात सुरू झाली आहे. पण काही पुस्तकांत असे दावे आहेत, ज्यावरून फातिमा शेख या खरेच अस्तित्वात होत्या असे म्हणण्यास वाव असल्याचे दिसून येते. महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानाचा संदर्भ घेतल्याशिवाय भारतातील स्त्री शिक्षणाचा इतिहास अपूर्ण राहतो. त्यामुळे फातिमा शेख यांच्या कार्याच्या पाऊलखुणा शोधताना महात्मा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त होते. रिटा राममूर्ती गुप्ता यांच्या 'सावित्रीबाई फुले' या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे की, फातिमा शेख यांचा जन्म ब्रिटीश भारतातील आग्रा प्रेसिडेन्सीमध्ये एका जुलाहा (अन्सारी) कुटुंबात झाला. पण कालांतराने त्या फातिमा शेख म्हणून ओळखल्या जावू लागल्या. विणकाम हे त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय होता. 1837-38 मध्ये आग्रा प्रेसिडेन्सीमध्ये भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे फातिमा यांच्या कुटुंबाला महाराष्ट्रात स्थलांतर करावे लागले. त्या पहिल्यांदा मालेगावात स्थायिक झाल्या. त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडिल, भाऊ मियां उस्मान, फजलू चाचा व त्यांची पत्नी खादीजा बेगम हे होते. राजकीय अस्थिरतेमुळे मालेगावात पूर्वीपासूनच अनेक उत्तर भारतीय मुस्लिम स्थायिक झाले होते. त्यामुळे दुष्काळामु्ळे स्थलांतरित होणाऱ्यांचे अंतिम गंतव्यस्थान साहजिकच मालेगावच होते. अशा प्रकारच्या स्थलांतरावेळी तत्कालीन लोक स्वतःची ओळख बदलत होते. कदाचित यामुळेच फातिमा व त्यांच्या भावाचे आडनाव बदलून शेख झाले असावे असे मानले जाते. स्थलांतराच्या कष्टामु्ळे फातिमा यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचे वडिलही गेले. त्यावेळी उस्मान अवघ्या 13 वर्षांचा होता. त्याच्या अंगावर फातिमाच्या संगोपनाची जबाबदारी आली. उस्मानने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याने फातिमालाही नक्षीकाम व शिवणकाम शिकवले. त्यानंतर 1842 साली पुन्हा एकदा त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ आली. यावेळी ते मालेगावाहून पुण्याच्या गंजपेट भागात पोहोचले. तिथे उस्मानने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. फातिमाही आपल्या कामात तरबेज झाली होती. तिचे बहुतांश ग्राहक या ब्रिटीश महिला होत्या. फातिमाने या इंग्रज महिलांकडून गणित शिकले तर त्याचा आपल्याला फायदा होईल असे उस्मान यांना वाटत होते. त्याच्या या इच्छेमु्ळेच फातिमासाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली. फातिमाने मदरशातून मुलभूत शिक्षण घेतले होते, पण त्यानंतर त्यांनी उर्दू, अरबी, मराठी व इंग्रजी भाषेतही प्राविण्य मिळवले. सावित्रीबाई व फातिमा शेखची पहिली भेट केव्हा झाली? रिटा राममूर्ती गुप्ता यांच्या मते, सावित्रीबाई फुले व फातिमा यांची पहिली भेट केव्हा झाली? याविषयी दोन मतप्रवाह आहेत. काही पुस्तकांनुसार फातिमा व सावित्रीबाईंची पहिली भेट सिंथिया फरार यांच्या अहमदनगर येथील शाळेत झाली. तर काही पुस्तकांमध्ये या दोघी मिसेस मिशेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये एकमेकांना भेटल्याचा दावा करण्यात आला आहे. पण मिसेस मिशेल यांची द फीमेल नॉर्मल स्कूल पुण्यात होती. त्यामुळे या दोघींनी तिथेच एकत्र शिक्षण घेतल्याची दाट शक्यता आहे. 'बॉम्बे गार्डियन'नुसार (22 नोव्हेंबर 1851), सावित्रीबाई अहमदनगर स्थित सिंथिया फरार यांच्या संस्थेत शिकल्या. त्यानंतर त्यांनी पुण्यातील मिसेस मिशेल यांच्या नॉर्मल स्कूलमधून शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतले. कदाचित हे देखील शक्य आहे की, फातिमा व सावित्रीबाई या दोघींनी मिशेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतले असेल आणि त्यानंतर अहमदनगर येथील सिंथिया फरार यांच्या संस्थेतून शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतले असेल. पण या दोघींनीही दोन्ही ठिकाणी शिक्षण घेतले हे जवळपास खरे आहे. कारण, सिंथिया फरार या फातिमा शेख यांच्या आवडत्या शिक्षिका होत्या. यामुळेच त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्या अहमदनगरला आल्या होत्या असे सांगितले जाते. सावित्रीबाई फुलेंच्या पत्रात फातिमाचा उल्लेख महात्मा फुल्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तिथे सावित्रीबाई शिक्षिका होत्या. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्यांनी 1 मे 1849 रोजी पुण्यातच उस्मान शेख यांच्या घरी प्रौढ शिक्षणासाठी दुसरी शाळा सुरू केली. या शाळेवर फातिमा पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. सावित्रीबाई फुले यांनी 10 ऑक्टोबर 1856 रोजी महात्मा फुल्यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी फातिमा आपली सहकारी असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. आपल्या पत्रात सावित्रीबाई म्हणतात, 'माझी तब्येत उलटी पालटी होऊन आता थोडी ताळ्यावर आली आहे. या दुखण्यात भाऊने अपरिमित श्रम घेऊन माझी सेवा केली. यावरून तो किती प्रेमळ आहे हे दिसून येते. मी परिपूर्ण दुरुस्त होताच पुण्यास येईन. काळजीत असू नये. फातिमास त्रास पडत असेल, पण ती कुरकूर करणार नाही' सावित्रीबाईंचे हे पत्र 1991 मध्ये प्रकाशित झालेल्या 'वूमेन रायटिंग इन इंडिया: 600 बीसी टू द प्रझेंट' नामक पुस्तकात प्रकाशित झाले होते. त्यामुळे फातिमा शेख हे पात्र काल्पनिक नव्हे तर खरेच अस्तित्वात होते हे पुन्हा एकदा स्पष्ट होते. फातिमा शेख यांचे ऐतिहासिक छायाचित्र फातिमा शेख यांचा उल्लेख असणारा आणखी एक पुरावा आढळतो. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने 1988 साली पहिल्यांदा सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय प्रकाशित केले होते. या पुस्तकामध्ये एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. या फोटोखाली एक कॅप्शन आहे. त्यावर लिहिले आहे, 'सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख आपल्या दोन विद्यार्थिनींसह'. हा फोटो 100 वर्षांपूर्वीच्या निगेटिव्हवरून तयार करण्यात आल्याचेही त्याखाली नमूद करण्यात आले आहे. या पुस्तकाचे संपादक डॉक्टर म. गो. माळी यांनी आपल्या प्रस्तावनेत त्याची माहिती दिली आहे. त्यामुळे फातिमा शेख यांचे अस्तित्व 2006 पूर्वीही होते हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे 'मजूर' नियतकालिकाचे संपादक डी. एस. झोगडे यांनी डॉक्टर माळी यांना हे छायाचित्र दिले होते. झोगडे यांना या फोटोची निगेटिव्ह पुण्यातील एकनाथ पालकर यांच्याकडे मिळाली होती. तत्पूर्वी, हा दुर्मिळ फोटो लोखंडे नामक मिशनरीच्या व्यक्तीने सर्वप्रथम छापला होता. जवळपास 100 वर्षे जुन्या निगेटिव्हपासून हे छायाचित्र तयार करण्यात आले होते. या ऐतिहासिक फोटोमुळेच लोकांना सावित्रीबाई व फातिमा शेख कशा दिसत होत्या? याचे उत्तर मिळाले. हा फोटो नसता तर कदाचित आपल्याला फातिमा शेख यांच्याविषयी माहिती मिळवणे फार अवघड झाले असते. तसेच त्या कशा दिसत होत्या? हे समजले नसते. आता पाहू फातिमा शेख यांच्या कार्याविषयी उपलब्ध असणारी माहिती गुगलवर आपण 'भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका' असे सर्च केले की आपल्याला आढळेल की, फातिमा शेख (9 जानेवारी 1831 ते 9 ऑक्टोबर 1900) एक भारतीय शिक्षिका व समाजसुधारक होत्या. त्या महात्मा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले याच्या सहकारी होत्या. त्यांना भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून ओळखले जाते. देशाच्या विविध भागांत विशेषतः महाराष्ट्रात फातिमा शेख यांची आठवण अशा प्रकारे काढली जाते. कधिकाळी हिंदुत्त्वाचे प्रखर विरोधक राहिलेल्या दिलीप मंडल यांची केंद्राने ऑगस्ट 2024 रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम सल्लागारपदी नियुक्ती केली आणि त्यांनी थेट फातिमा शेख यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे मंडल यांनी त्यांनी असे का केले? याचे उत्तर दिले नाही. त्यांनी केवळ ही तात्कालिक गरज होती असे नमूद केले आहे. फातिमा शेख यांचे जीवन व कार्य याविषयी फारसे साहित्य उपलब्ध नाही. पण त्यानंतरही सरकारने त्यांची भूमिका मान्य केली आहे. यामुळेच 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने बालभारतीच्या पुस्तकात सर सय्यद अहमद खान, झाकीर हुसेन, अब्दुल कलाम आझाद यांच्या सोबतीने फातिमा शेख यांच्या व्यक्तिरेखेचा संक्षिप्त समावेश केला आहे. हरी नरके यांचे काही महत्त्वाचे सवाल फातिमा शेख यांच्या नावाचा 9 जानेवारी 2022 मध्ये मोठा उदोउदो झाला. त्या दिवशी गुगलने फातिमा यांना आदरांजली वाहण्यासाठी डुडल बनवले होते. त्याच्या अनेक बातम्या माध्यमांत आल्या होत्या. केवळ बातमीच नव्हे तर त्यांचा सोशल मीडियावरही चांगलाच गाजावाजा झाला होता. पण फुले दाम्पत्याचे चरित्र अभ्यासक दिवंगत प्राध्यापक हरी नरके यांनी फातिमा शेख यांच्याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. पण त्यांनी फातिमा शेख यांचे अस्तित्व नाकारले नव्हते. हरी नरके गुगलच्या डुडलवर भाष्य करताना आपल्या 9 जानेवारी 2022 च्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले होते, फातिमा शेख यांना जयंती निमित्त अभिवादन करणारे डुडल आणि त्यानंतर सोशल मीडियावर अभिवादनाचा वर्षाव सुरुय. आनंद आहे. ही जन्मतारीख नेमकी कोणी शोधून काढली? कधी काढली? कशाच्या आधारे? कोणत्या दस्तऐवजात ही नोंद मिळाली हे मला समजून घ्यायला आवडेल. कृपया कुणी सांगू शकेल का? एक कळकळीची विनंती. या पोस्टवरील एका कमेंटला उत्तर देताना ते म्हणाले होते, फातिमा यांचे लेखन सापडलेले नाही. त्यांचे फार त्रोटक उल्लेख मिळतात. हरी नरकेंनी फेटाळले नाही फातिमा शेखचे योगदान या पोस्टनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 जानेवारी 2022 च्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये हरी नरके म्हणाले होते, काल मी फातिमा शेख यांच्या जन्मतारखेचा दस्तऐवज विचारल्याबद्दल काही मंडळींनी आरडाओरडा सुरू केला.मला अल्पसंख्य समाजाच्या विरोधातला, विशिष्ट विचारधारेचा हस्तक वगैरे ठरवण्यात आले. त्यावर खुलासे करण्याची मला गरज वाटत नाही. यानिमित्ताने आत्मप्रौढी वाटेल पण काही नोंदी करायला हव्यात. हरी नरके यांनी नोंदवलेल्या नोंदी थोडक्यात... हरी नरके यांच्या या भूमिकेमुळे त्यांनी फातिमा शेख यांचे अस्तित्व नाकारले नाही नसल्याचे स्पष्ट होते. पण त्यांनी याविषयी अधिकचे संशोधन होण्याची निश्चितच गरज व्यक्त केली होती. या विविधांगी माहितीमुळे दिलीप मंडल यांनी काहीही दावा केला असला तरी फातिमा शेख यांच्या अस्तित्वाच्या खानाखुणा 2006 पूर्वीही उपलब्ध होत्या हे अधोरेखित होते. त्यामुळे दिलीप मंडल यांनी केलेला दावा काहीसा संभ्रम पसरवणारा वाटतो.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GqHDlMZ
धुरंधर; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा
January 25, 2025
0