बारामती मधील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे कार्यक्रमावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाचे पैसे 31 तारखेच्या आज भरण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर याच वर्षी काय? पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे त्यांनी थेटच सांगितले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड चित्रपटातील एका गाण्याचा संदर्भ देत दादा क्या हुआ तेरा वादा? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार यांना विचारला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारच्या वतीने तशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात तरी शेतकऱ्यांना तसा दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अर्थसंकल्पात देखील शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आली नाही. यानंतर आता अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगितले. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था करून ठेवलीत...पाण्याविना पिके करपून गेलीत. काही भागांत दुष्काळाची परिस्थिती आहे...लोकांना वीज बिल, शैक्षणिक खर्च, इतर वैयक्तिक कर्ज यामध्ये गुरफटून ठेवले आहे... कुठून भरतील कर्जे आणि कुठून आणणार पैसा...? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला आहे. ते सत्तेत थोडीच आहेत. तुम्हीच आश्वासने दिली होती. शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार म्हणून. शेवटी जनता म्हणतेय दादा क्या हुवा तेरा वादा... वो कसंम वो इरादा. अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून केली आहे. हर्षवर्धन सपकाळांचा अजित पवारांवर हल्लाबोल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर, हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. 2100 चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर 1500 रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन 10 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत, अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांच्या कर्जमाफीबद्दलच्या विधानाचा समाचार घेतला. अजित पवारांचे कर्जमाफीबाबतचे वक्तव्य विचारपूर्वक - महाजन अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे काही वक्तव्य केले असेल ते विचारपूर्वक केले असेल. लाडकी बहीण योजनेचे राज्यात 41 हजार कोटींचे बजेट आहे. त्यामुळे कदाचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर त्यांनी हे वक्तव्य केले असावे. एक-दोन वर्षात अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग कर्जमाफीचा विचार केला जाईल, असे मंत्री महाजन म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Ijxske5
दादा क्या हुवा तेरा वादा, वो कसम वो इरादा:शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला
March 29, 2025
0