राज्यात पावसाचा जोर अद्यापही असमान स्वरूपाचा कायम असून, पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट तर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारेही वाहू शकतात. १ ऑगस्ट रोजी पुणे घाट, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक घाट परिसर तसेच अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. २ ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी या किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर व सातारा घाट परिसर तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशीम जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा 'यलो अलर्ट' राहील. ३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर तसेच अकोला, अमरावती, बुलढाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ४ आणि ५ ऑगस्ट या दोन दिवसांत पावसाचा जोर मुख्यत्वे विदर्भात केंद्रित राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यासाठी ४ ऑगस्टला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सखल भाग, नदी-नाले, धरण परिसर आणि घाट रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, तसेच विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. हे ही वाचा.. कॉकरोज जनता पार्टीच्या अडचणी वाढणार?:विदेशी फंडिंगची ईडीकडून चौकशी सुरू; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती दिल्लीत अभूतपूर्व आंदोलन उभे करून थेट धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणारी 'कॉकरोच जनता पार्टी' आता सरकारच्या रडारवर आली आहे. 'नीट' पेपरफुटीविरोधात उभारलेल्या या आंदोलनाची आणि त्यात 'जेन झी' तरुणाईने घेतलेल्या सक्रिय सहभागाची जगभरात चर्चा झाली. मात्र, या यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीला मिळणाऱ्या विदेशी देणग्यांची आता सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. राज्य सरकार आणि अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी कारवाई सुरू केल्याने नवा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. सविस्तर वाचा… विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयावर संभ्रम:आदित्य ठाकरेंचे थेट पोलिस महासंचालकांना पत्र, उपस्थित केले 7 प्रश्न दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अद्याप मोठा संभ्रम कायम आहे. अनेक विद्यार्थ्यांना अजूनही पोलिस नोटीसा येत असून काहींचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणी तात्काळ 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' (SOP) जारी करून ७ प्रमुख मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा…
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/vtm7Lfx
राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर वाढणार:घाटमाथ्यावर ऑरेंज, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा इशारा
August 01, 2026
0