Type Here to Get Search Results !

धुरंधर; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परमशिष्य, बहुजन चळवळीतील झुंझार सेनानी व चैत्यभुमि निर्मितीचे शिल्पकार पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्त 'दिव्य मराठी'ची विशेष मालिका 'धुरंधर'मध्ये पाहूयात.. दादासाहेबांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घडमोडी... भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1902 रोजी झाला होता. तर त्यांचा मृत्यू 29 डिसेंबर 1971 रोजी झाला. राजकारणाबरोबरच समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे होते. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षही होते. मुंबई विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार आणि लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे. दादासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष करून जनहिताची व दलितोद्धाराची कामे केली. अनेकांना रोजगार मिळवून देऊन त्यांचे संसार थाटून दिले. अनेकांना बढत्या देऊन त्यांना मोक्याच्या जागा मिळवून दिल्यात. गरीब मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शिक्षणसंस्था व वसतिगृह सुरू केली. 1967 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर राजकीय समझोता करून संबंध देशात महाराष्ट्रात पहिल्यांदा बौद्धांना सवलती मिळवून दिल्या. समान कार्यक्रम आखून दलित चळवळ गतिमान केली. अनेक नेत्यांना उच्चपदी बसवून रिपब्लिकन पक्षाचे नाव रोशन केले. लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नामवंतांची वर्णी लावली. रिपब्लिकन पक्षाला राजकीय प्रतिष्ठा मिळवून पुढे अनेकांच्या आयुष्याचे सोने केले. स्वत:च्या कौशल्याने दिल्ली येथे लोकसभेच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारून घेतला. इतकेच नाही तर नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी 14 एकर जागा मिळवून देऊन त्या ठिकाणी भव्य विहार, पुतळा, कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. चैत्यभूमी दादर येथे जागा मिळवून देण्याची किमया देखील दादासाहेबांचीच. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून लोकांनी त्यांना सन्मानाने ‘कर्मवीर’ हा किताब बहाल केला. भारत सरकारनेही त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत होते की, "माझ्या आत्मचरित्रात अर्धा भाग भाऊराव गायकवाड असणार आहे. तो नसला, तर माझे चरित्र पूर्ण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्यातच दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षातील महत्त्वाचे स्थान दिसून येते. बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. 2 मार्च 1930 च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी डॉ. आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. दादासाहेबांनी अनेक आंदोलनांत आंबेडकरांना साथ दिली. समाजाविषयींचा त्यांचा कळवळा हा आंतरिक उमाळ्यातून आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील दलित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जो व्यापक संघर्ष सुरू केला त्या संघर्षात बाबासाहेबांना साथ देण्यासाठी सुरुवातीच्या काळात पुढे आलेल्या दलित युवकांपैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे एक होत. 20 मार्च 1927 चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि 2 मार्च 1930 चा प्रत्यक्षात 3 मार्च 1930 रोजी केला गेलेला नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, या सत्याग्रहांमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बरोबरीने दादासाहेबांनी भाग घेतला होता. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या इतर चळवळीं मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात दादासाहेबांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांना ओळखले जात होते. दोन वेळा दादासाहेबांनी वाचवले बाबासाहेबांचे प्राण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते. या नात्यातून दादासाहेब गायकवाड यांनी दोनदा अडचणीच्या काळात बाबासाहेबांचे प्राण वाचवले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी एका मुलाखतीत या संदर्भातील माहिती दिली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. त्यांनी त्यातून मार्गही काढला आणि वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी कठोर परिश्रम देखील घेतले. मात्र, त्यांच्या आयुष्यात अशा दोन घटना घडल्या ज्या वेळी दादासाहेब गायकवाड यांनी बाबासाहेबांची या संकटांमधून सुखरूप सुटका केली होती. पहिला प्रसंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकदा न्यायालयीन कामासाठी नाशिकला येत असत. नाशिक दौऱ्यादरम्यान आंबेडकर हे नाशिक येथील शाहू बोर्डिंगचे अधीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्याकडेच राहत होते. वास्तविक बाबासाहेब आणि दादासाहेब यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते. दादासाहेब गायकवाड हे रोज सकाळी गोदावरी नदीत स्नानासाठी जात होते. एकदा बाबासाहेबांनी दादासाहेबांना विनंती केली की मलाही नदीत पोहायचे आहे. त्यामुळे ते दोघेही नदीकाठी पोहोचले. बाबासाहेबांनी पोहण्याचा हट्ट धरला. मात्र, समुद्र आणि नदीत फरक असतो, असे सांगून त्यांनी नदीत जाऊ नये, अशी विनंती त्या वेळी दादासाहेबांनी केली. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे ऐकले नाही. त्यांनी नदीत उडी मारल्यानंतर काही वेळातच एक भोवरा निर्माण झाला आणि बाबासाहेब त्या भोवऱ्यात अडकले. त्या वेळी बाबासाहेबांनी दादासाहेबांना हाक मारली. बाबासाहेब बुडत असल्याचे दादासाहेबांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना नदीतून बाहेर काढले. बाबासाहेबांच्या तोंडात गेलेले पाणी दादासाहेबांनी बाहेर काढले, काही वेळाने बाबासाहेब शुद्धीवर आले. प्रसंग दुसरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'चवदार तळे सत्याग्रहा'साठी महाडला गेले होते. नेहमीप्रमाणे दादासाहेब गायकवाड देखील त्यांच्यासोबतच होते. दरम्यान, बाबासाहेब रात्री आंदोलनाचा विचार करत रस्त्यावरून चालले होते. दादासाहेब देखील त्यांना पाहून त्यांच्या मागे रस्त्यावरुन चालू लागले. मात्र, रस्त्यात एका ठिकाणी पाठीमागून येणाऱ्या दादासाहेबांनी अचानक डॉ. बाबासाहेबांना मागून उचलले आणि बाजूला घेतले. बाबासाहेबांना नेमके काय झाले ते कळालेच नाही. त्यांनी दादासाहेबांना असे करण्यामागचे कारण विचारले. त्या वेळी दादासाहेबांनी त्यांना दाखवले की त्यांच्या पायात एक साप होता. त्याने बाबासाहेबांना दंश केला असता. मात्र, दादासाहेबांनी बाबासाहेबांना वेळीच बाजूला केले. रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. पुढे या पक्षाची फाटाफूट झाल्यावर त्याच्या एका प्रभावी गटाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. रिपब्लिकन पक्षात ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले; पण दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आले नाही. दलित समाजातील सर्वांत मोठ्या गटाने गायकवाडांच्या नेतृत्वालाच मान्यता दिली होती. आमदार तसेच लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार 1937 मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारतीय संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे ते अनुक्रमे 1957 ते 1962 आणि 1962 ते 1968 या कार्यकाळात ते सदस्य होते. लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दुसरे सदस्य प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतराविरुद्ध विधेयक आणण्याच्या केलेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ त्यांनी लोकसभेत मनुस्मृती फाडून 1927 मध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून केलेल्या प्रतीकात्मक निषेधाची आठवण करून दिली. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या सार्वजनिक कार्याचा व समाजसेवेचा गौरव केला होता. समर्पित जीवनाची आहुती आयुष्यभर दलितांच्या उद्धारासाठी झटलेला हा माणूस स्वत:चे दु:ख व वेदना लपवून 29 डिसेंबर 1971 रोजी सर्व दलित-शोषित, कष्टकरी समाजाला पोरका करून गेला. एका झंझावती संघर्षमय जीवनाची अशा तऱ्हेने पूर्णाहुती झाली. ती खऱ्या अर्थाने समर्पित जीवनाची आहुती होती. त्यांच्या मृत्यूमुळे आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचा तारा निखळला व कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. अशा या झुंझार गौरवशाली लोकनेत्यास विनम्र अभिवादन...

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GESm1h4

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.