Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरी:पहिलवानांना अपाय हाेऊ नये म्हणून लालमातीत मिसळली 200 किलो हळद, 500 लिटर दूध-तेल

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेचा थरार २९ जानेवारीपासून अहिल्यानगर शहरातील बलभीमअण्णा जगताप मैदानावर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी लाल मातीच्या दोन मैदानांची दहा दिवसांपासून मशागत सुरू आहे. या मातीत २०० किलो हळद, ५०० लिटर मोहरी तेलासह ५०० लिटर दूध टाकून मशागत करण्यात आली. यामुळे माती मऊ आणि आयुर्वेदिक झाली आहे. याच मातीत ८६० मल्लांच्या कुस्तीचा थरार रंगणार आहे. वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. स्पर्धेसाठी लाल मातीचे दोन आखाडे व गादीचे स्वतंत्र आखाडे आहेत. शहर व परिसरातील संभाजीराजे कुस्ती केंद्र, वाडिया पार्क तालीम संघ, सम्राट इंटरनॅशनल कुस्ती केंद्र, शिव कुस्ती केंद्र या तालमीतून तब्बल ३६ ब्रास लाल माती आणण्यात आली. ही माती मागील पाच ते दहा वर्षांपासून जतन करून महाराष्ट्र केसरीचा थरार...ठेवलेली आहे. बलभीमअण्णा जगताप मैदानावर आणल्यानंतर चाळून घेण्यात आली. गोलाकार आखाड्यात माती भरल्यानंतर स्पर्धेपूर्वी मातीला खुराक म्हणून आवश्यक पदार्थ देण्यात आले. दोन आखाड्यांसाठी २०० किलो हळद, ५०० लिटर सरसोचे तेल, गेरू रंग १०० गोणी, ५ क्विंटल लिंबाचा रस, ५०० लिटर दुध तर ४० ते ५० किलो कापूर टप्प्याटप्प्याने मिसळण्यात आला आहे. यामुळे लाल मातीत आयुर्वेदिक गुण निर्माण झाले आहेत.१८ बुलेट, ३० सोन्यांच्या अंगठ्यांचे मानकरी : स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब विजेता एक चार चाकी (थार), गदा, उप महाराष्ट्र केसरी एक चारचाकी (बोलेरो) पारितोषिक दिले जाईल. तसेच प्रत्येक वजनगटानुसार १८ विजेत्यास बुलेट, १८ उपविजेत्यास मोटारसायकली तर तृतीय क्रमांकास ३० सोन्याच्या अंगठी बक्षीस दिल्या जाणार आहेत. २५ हजार प्रेक्षकांची व्यवस्था अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी राज्य संघटनेला स्पर्धा भरवण्याबाबत प्रस्ताव दिला होता, त्यास मान्यता मिळाल्यानंतर, आयोजनाचा मान जिल्ह्याला मिळाला. या स्पर्धा विविध वजनगटात होत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून मातीवर खेळणारे दहा तर गादीवर खेळणाऱ्या दहा मल्लांचा चमू दाखल होणार आहेत. मैदानावर सुमारे २०० मजूर दहा दिवसांपासून काम करत आहेत. प्रेक्षकांना कुस्तीचा थरार पाहता यावा, यासाठी २५ हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २ फेब्रुवारीला महाराष्ट्र केसरी लढत महाराष्ट्र केसरी किताबासाठी राज्यभरातील मल्ल खेळणार आहेत. किताबासाठी अंतिम लढत २ फेब्रुवारीला होणार आहे. त्यात गादीवरील स्पर्धेतील विजेता व मातीतील विजेता या दोघांमध्ये ही लढत होणार आहे. अंतिम लढतीत विजयी झालेल्या मल्लाला थार गाडी व गदा दिली जाणार आहे. आयुर्वेदिक महत्त्व असे... तेल, दूध स्निग्ध आहेत, माती रुक्ष असते. त्यात तेल, दूध हे स्निग्ध पदार्थ मिसळल्यास मातीतील रुक्षता कमी होते. व्यायाम हा वातप्रकोप करणारा आहे, स्निग्ध गुणांमुळे वातप्रकोप कमी होतो. कापूर डोळ्यांना हितकर आहे. हळद ही त्वचेसाठी चांगली असते. या पदार्थांमुळे नकोशा जिवाणूंची वाढ होत नाही. मल्लाला अपाय होत नाही. वैद्य प्रभाकर पवार, आयुर्वेदाचार्य.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/uzWbXPH

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.