अमरावती सर्वसामान्यांच्या वेदना, हुंकार, दु:ख यांचे साहित्यातून चित्रण होणे महत्त्वाचे असते. लेखन प्रक्रिया ही चिरंतन व जीवनमूल्यावर आधारित आहे. त्यात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय यांपासून जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करण्याची ताकद असते. थोडक्यात समाजात असणाऱ्या अस्वस्थतेतूनच साहित्य निर्मिती प्रक्रिया सुरू होते, असे प्रतिपादन ‘अऊत्या’ कादंबरीचे लेखक शेषराव खाडे यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघाची अमरावती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या मराठी विभागात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. मोना चिमोटे होत्या. शेषराव खाडे म्हणाले, की नेहमी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून लिखाण केले पाहिजे. साहित्य निर्मिती प्रक्रियेचे सूत्र आणि त्यातील अंतरंग यांची सर्वांगीण माहिती दिली. तसेच कादंबरी या साहित्य प्रकारची ओळख करून कादंबरी लेखनाचा प्रवास आणि त्या प्रक्रियेतील विविध टप्पे उलगडले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. चिमोटे म्हणाल्या, की विविधांगी समृद्ध जीवनानुभवातून दर्जेदार साहित्याची निर्मिती होत असते. कालसुसंगत लेखन करून समकालाचे भान जागृत करून देणाऱ्या लेखकांमध्ये शेषराव खाडे यांचा उल्लेख करता येईल. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत पुस्तक परीक्षण स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. ज्यात प्रथम पारितोषिक वर्षा लोणारे, द्वितीय पारितोषिक पूजा अडोळे, तृतीय पारितोषिक साक्षी धुळे तर उत्तेजनार्थ पारितोषिक अभिजित इंगळे यांनी पटकावले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रणव कोलते यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. माधव पुटवाड, डॉ. वैभव म्हस्के, संशोधक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. व्याख्याते शेषराव खाडे यांचे स्वागत करताना डॉ. मोना चिमोटे. शेजारी इतर मान्यवर. लेखक आपल्या भेटीला अभ्यासक्रमात असलेल्या लेखकाला प्रत्यक्ष ऐकायला मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी उपलब्धी असते. खाडे यांच्या ‘अऊत्या’, ‘नियती’ यांसारख्या कादंबऱ्यांमधून जीवन व्यवहाराचे भावनिक, वैचारिक नि बौद्धिक असे विविधांगी दर्शन घडते. वैदर्भीय ग्रामीण वास्तवाचे अंतर्मुख करणारे चित्रण खाडे यांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/I1et0HB
अस्वस्थतेतूनच साहित्य निर्मितीची प्रक्रिया सुरू:कादंबरीकार शेषराव खाडे यांचे प्रतिपादन; मान्यवरांची उपस्थिती
January 30, 2025
0