मानवी मेंदूवर सोशल मीडियाचा जो सर्जिकल स्ट्राइक झालेला आहे, त्याचा आपल्या जीवनात प्रभाव पडू नये आणि सोशल मीडियाचा उपयोग मानवाने आपल्या विकासासाठी करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक अविनाश दुधे यांनी केले. जनविकास शिक्षण संस्थाद्वारा संचालित कला, वाणिज्य महाविद्यालय येवदा येथील सभागृहात कै. वासुदेवराव कोकाटे व्याख्यानमाला झाली. यावेळी ‘सोशल मीडिया व मानव’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका अलका कोकाटे होत्या. सचिव गजानन कोकाटे, किरण कोकाटे, सहसचिव देविदास कोकाटे तसेच नीलकंठ गणवीर, दिलीप डवरे व संजय पखान यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी संत नारायण गुरु विद्यालय, गायवाडी येथून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्याबद्दल अलका कोकाटे यांचा वाणिज्य महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच किरण कोकाटे, अविनाश दुधे व अर्चना पखान यांचाही सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, गजानन कोकाटे यांनी वाचन संस्कृती ही जीवन संस्कृती यावर विचार मांडले. तसेच प्रा. वाय. जे. सिंग यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातून ‘संविधान, संविधानवाद आणि संवैधानिक नैतिकता’ या विषयावर प्रा. डॉ. संदीप डोंगरे आणि सुनील थोरातद्वारा संपादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुल टेवरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. अनिल कत्रोजवार यांनी केले तर आभार प्रा. डॉ. सुनीता सावरकर यांनी मानले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. नसत्या जिजाऊ तर नसते घडले छत्रपती शिवाजी महाराज अर्चना पखान यांनी ‘नसत्या जिजाऊ तर नसते घडले शिवराय’ या विषयावर बोलताना राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत सविस्तर विवेचन सादर केले. स्त्रियांमध्ये हे गुण विकसित करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांचे चरित्र वाचन करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/DL6XihW
सोशल मीडियाचा उपयोग आपल्या विकासासाठी करावा:ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे यांचे प्रतिपादन
January 20, 2025
0