मंत्रिपद नाकारल्यानंतर अखेर ४९ दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांना फोन केला. काॅल करण्यास उशीर केला याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि लवकरच बसून बोलू, असे आश्वासनही दिले, अशी माहिती भुजबळ यांनीच दिली. दोन दिवसांपू्र्वी भुजबळांनी रात्री उशिरा सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असा दावा भुजबळांनी केला होता. मात्र, गुरुवारी त्यांनी अजित पवारांच्या काॅलविषयी जी माहिती उघड केली त्यावरून फडणवीसांशी त्यांची मंत्रिमंडळात चांगल्या खात्यासह समावेश याविषयीच चर्चा झाली असावी, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात अजित पवारांनी संधी दिली नाही म्हणून नाराज भुजबळांनी ‘जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहेना’ असे म्हणत नागपूर सोडले होते. फडणवीसांनी आठ दिवसांत मार्ग काढतो, असे तेव्हा म्हटले होते. मात्र चेंडू अजित पवारांच्या कोर्टात होता आणि ते निर्णय घेत नव्हते. त्याचदरम्यान भुजबळांची भाजप आणि शरद पवारांशीही जवळीक वाढली होती. त्यांना भाजपकडून राज्यपालपदाची आॅफर होती. मात्र, ओबीसींच्या प्रश्नांवर बोलता येणार नाही, असे म्हणून त्यांनी ती आॅफर धुडकावली होती. राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्यासही ते तयार नव्हते. शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीविषयी भुजबळ म्हणाले की, नाशिकला सिंहस्थ कुंभासाठी निधी मिळावा. कांद्यावरील निर्यात मूल्य काढून टाकावे, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. उद्धव ठाकरे सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ २ हजार केंद्रातून लाखो गोरगरिबांना होत आहे. म्हणून ही योजना बंद करू नये, अशी विनंतीही मी मुख्यमंत्र्यांना केल्याचे त्यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/168bsUH
अजित पवार भुजबळांना म्हणाले, लवकरच बोलू:मंत्रिपद नाकारल्यानंतर 49 दिवसांनी केला फोन
February 06, 2025
0