ग्रामीण कथा, कादंबरी आणि नाटककार म्हणून ओळख असणारे प्राचार्य रा. रं. ऊर्फ रावसाहेब रंगराव बोराडे ( ८४) यांचे मंगळवारी (११ फेब्रुवारी) निधन झाले. साधी, सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. मराठी साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य सरकारचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला होता. छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती जकात नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बोराडे यांनी लिहिलेल्या ‘पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना ‘पाचोळा’कार हे नामाभिधान मिळाले. या साहित्यातून मराठवाडी बोलीची अनेक वैशिष्ट्ये प्रकट झाली. धक्कादायक शेवट हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९४० रोजी काटगाव (जि. लातूर) येथे झाला होता. पण त्यांची कारकीर्द संभाजीनगर जिल्ह्यातच पूर्ण झाली. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषवले राज्य सरकारने बोराडे यांची २००० साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सरकारी गोदामात पडून असलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करायला लावली. खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक मिळण्यावर ठाम साहित्य संमेलनाची निवडणूक लढवायची नाही, हे पद सन्मानपूर्वक प्रदान केले जावे, असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते वंचित राहिले. जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. १९८९ मध्ये हिंगोलीतील १७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना मिळाले होते. जन्म : २५ डिसेंबर १९४० निधन : ११ फेब्रुवारी २०२५
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SVJtc0Y
मराठवाडी बोलीचे लेखक रा. रं. बोराडे यांचे निधन:सरकारच्या जीवनगौरव पुरस्काराने झाला होता गौरव
February 11, 2025
0