Type Here to Get Search Results !

हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी धर्माभिमानी तरुणांची फौज पुढे येणे आवश्यक:जाटदेवळेकर यांचे मत, तपनेश्वर मंदिर परिसरात शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा

धर्माभिमानी तरुणांची फौज हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी शक्तिशालीपणे पुढे येणे गरजेचे आहे. प्रत्येक तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र कथा ऐकली पाहिजे. न्याय, नीती, सदाचार व पुरुषार्थाचा खजिना म्हणजे छत्रपतींचे कार्य असल्याचे मत शिवचरित्र कथाकार गोविंद महाराज जाटदेवळेकर यांनी व्यक्त केले. शहरातील श्री क्षेत्र तपनेश्वर मंदिर परिसरात तपनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने आयोजित ४७व्या अखंड हरिनाम सप्ताह व शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा होत आहे. त्यात ते बोलत होते. गुरुवारी (२७ फेब्रुवारी) या उपक्रमाची सांगता होणार आहे. कथाकाळात पहाटे काकडा, भजन, विष्णुसहस्त्रनाम, प्रार्थना, शिवलीलामृत, पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. शहराच्या इतिहासात प्रथमच अखंड हरिनाम सप्ताहात शिवचरित्र कथा ठेवून नव्या पिढीला छत्रपतींच्या कार्याचा वारसा कथा रूपाने सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोविंद महाराज म्हणाले, की लढाया, किल्ले व यवन राजवटीला सळो की पळो करून सोडत हिंदवी स्वराज्याची केलेली स्थापना, एवढ्यापुरते महाराजांचे कार्य मर्यादित नाही. छत्रपतींना हिंदूंच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थाने परमेश्वराने अवतारित केले. त्या काळात हिंदूंवर होणारे अत्याचार, अन्याय व स्वाभिमान हरवून यवनांच्या दरबारात चाकरी करणारी आपली माणसं अत्यंत उदास व लाचारीचे जीवन जगत होती. धर्म राहतो की जगण्यासाठी धर्म विसरावा लागतो, अशी परिस्थिती असताना छत्रपतींचा अवतार झाला. छत्रपतींनी मराठी माणसांमध्ये संघर्षाचे बीजे रोवली. मूठभर असली तरी समविचारी व धर्मासाठी प्राण अर्पण करणारी मावळ्यांची फौज राजांना देवच मानत होती. त्यांच्यातील देवत्वापुढे झुकत त्यांनी स्वतःमधील स्वत्व जागवले. मावळ्यांच्या मनात स्फुल्लिंग पेटवत देशासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी व माता-भगिनींच्या अब्रू रक्षणासाठी लढण्यास सिद्ध केले. रयतेचा राजा अशी बिरुदावली मिरवताना त्यांना आनंद वाटेल न वाटेल, यापेक्षाही मराठी मनाला आपणच राजे झाले आहोत, एवढे चैतन्य छत्रपतींच्या कर्तृत्वात आजही असल्याचे ते म्हणाले. तपनेश्वर मंडळाचे संस्थापक शंकरराव रासने, शरद पाथरकर, उमेश रासने, गोपाळ फळे आदी कार्यकर्ते सभासद व भाविक विशेष परिश्रम घेत आहेत. उठा, जागे व्हा, छत्रपतींचे विचार अंमलात आणा व्यसनाधीनता, आळशीपणा, धर्मकार्यासाठी उदासीनता, आपल्या अस्तित्वासाठी तरी आता आपल्याला छत्रपतींचे विचार कृतीतून अंमलात आणायला हवेत. उठा, जागे व्हा. छत्रपतींचा संदेश मेंदूमध्ये, मनगटामध्ये व छातीमध्ये ओतप्रोत भरवा. समाजबांधणीच्या कार्याला निघा. हिंदवी स्वराज्याचा भगवा फडफडताना आपल्याला डोळ्याचे पारणे फेटण्यासाठी आजपासून कार्याला लागा, असे कळकळीचे आवाहन महाराजांनी केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/lvukDym

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.