Type Here to Get Search Results !

उद्योगांचे परवाने रोखल्याने गोयल यांनी ‘एमपीसीबी’ला खडसावले:केंद्रीय मंत्र्यांच्या नाराजीनंतर एमपीसीबीचे सचिव मुंबईतून संभाजीनगरात

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी ऑरिक सिटीत घेतलेल्या बैठकीत उद्योजकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानग्यांसाठी त्रास होत असल्याचे सांगितले. उद्योजकांना पाच ते सहा महिने या परवानग्या मिळत नसल्याचा पाढाच वाचला. त्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरताच एमपीसीबीचे सदस्य सचिव मुंबईतून थेट शहरात दाखल झाले. त्यांनी उद्योजकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मंत्री पीयूष गोयल ऑरिक सिटीत असताना उद्योजकांनी मांडलेल्या समस्येनंतर गोयल यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव अविनाश ढाकणे यांना विचारणा केली. त्यानंतर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना फोनवर संवाद साधत उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे वेळेत परवानगी मिळाली पाहिजे. तुम्ही यामध्ये लक्ष घाला, अशा सूचना त्यांनी मुंडे यांना केल्या. एमपीसीबीमुळे उद्योग रखडल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. उद्योजकांना कुणाचाही त्रास होता कामा नये ढाकणे यांनी मसिआ कार्यालयात उद्योजकांसोबत बैठक घेतली. या वेळी ढाकणे म्हणाले की, उद्योग वाढले पाहिजेत. उद्योगांना शासनाकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यांना लागणाऱ्या परवानग्या वेळेत मिळतील. उद्योजकांना अडचणी असल्यास मला मेल करू शकता, असेही त्यांनी सांगितले. या वेळी मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, रमाकांत पुलकुंडवार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GB0WQxz

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.