Type Here to Get Search Results !

कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत कायदेशीर अभ्यासानंतर निर्णय:मुख्यमंत्री कायद्याचे अभ्यासक, त्यामुळे ते निर्णय घेण्यास सक्षम - गिरीश महाजन

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणामध्ये 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात वरिष्ठ नेते कायदेशीर अभ्यास करून निर्णय घेतील, असे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. हा प्रश्न तांत्रिक बाबीत अडकला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः याकडे लक्ष ठेवून आहेत, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला हप्ता लाभार्थ्यांना देण्यासाठी शनिवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतही भाष्य केले. नेमके काय म्हणाले गिरीश महाजन? माणिकराव कोकाटेंबाबत कायदेशीर बाब आणि तांत्रिक बाब आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. जे नियमानुसार असेल, जे सर्वांसाठी होते ते त्यांच्यासाठी देखील होईल, असे गिरीश महाजन म्हणाले. राजीनाम्याची मागणी तर सगळेच करतात. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. अनेकवेळा कुठे काही घटना घडली, तर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झालेली 100 वेळा बघितली असेल, असे गिरीश महाजन म्हणाले. राजीनाम्याच्या मागण्या रोज होत असतात. पण या सर्व बाबी नियमाच्या आधीन राहुनच कराव्या लागतात. तांत्रिकदृष्ट्या सर्व बाब तपासली जाईल आणि त्यानंतरच राजीनामा घ्यायचा की नाही, यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री हे कायद्याचे अभ्यासक आहेत, त्यामुळे ते निर्णय घेण्यास सक्षम आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री देखील अतिशय अनुभवी आहेत. अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतील, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. दोन दिवसांत पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतही भाष्य केले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. पालकमंत्री नियुक्त करण्यासही उशीर झाला आहे. गृहमंत्री अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झालीच असेल. येत्या दोन दिवसांतच हा तिढादेखील सुटेल, असा आशावाद गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. पालकमंत्री कोण होईल याबाबत विचारले असता, देवाच्या मनात असेल तसे होईल, असे ते म्हणाले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/cs9Uk67

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.