जालना रोडवरील साईबाबा मंदिर परिसरात एका मार्केटिंग एजंटची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून पसार झाले होते. १२ जानेवारी २०१७ रोजी हे हत्याकांड घडले होते. दरम्यान, या प्रकरणाचा उलगडा होत नसल्याने हे प्रकरण सीआयडीकडे साेपवण्यात आले होते. दरम्यान सीआयडीच्या पथकाने मृताच्या मैत्रिणीची चौकशी केली. यातून आरोपींचा सुगावा लागला अन् तब्बल ८ वर्षांनंतर हत्या करणाऱ्या एकाला अटक केली तर दोघांना ताब्यात घेतले. गणेश मिलिंद निकाळजे (३२, रा. अशोकनगर, मसनतपूर, ता. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एखाद्या सस्पेन्स चित्रपटाला लाजवेल अशा खुनाच्या गुन्ह्याचा तब्बल आठ वर्षांनंतर उलगडा सीआयडीच्या एसआयटीने केला आहे. २०१७ मध्ये रेल्वे रुळावर सापडलेल्या अमोल साबळेच्या छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेहामागे केवळ अपघात नव्हे, तर एक सुनियोजित कट असल्याचा उलगडा सीआयडीच्या तपासातून समोर आला आहे. गुन्ह्याच्या आठ वर्षांनंतर सीआयडीने या खुनातील एका आरोपीला सोमवारी (२१ एप्रिल) पहाटे अटक केली आहे. यामुळे अमोल साबळेच्या मृत्यूनंतर न्यायाच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकले आहे. नेमके काय घडले होते? १२ जानेवारी २०१७ च्या सायंकाळी अमोल साबळे आपल्या मार्केटिंग कंपनीतील मित्रांसोबत गेला आणि त्यानंतर तो परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर तुकडे झालेल्या अवस्थेत सापडला. सुरुवातीला हा अपघात मानण्यात आला होता, पण मृतदेहाच्या स्थितीवरून व फॉरेन्सिक अहवालानुसार खून असल्याचे स्पष्ट झाले. मात्र आरोपींचा ठावठिकाणा आठ वर्षे कुणालाही लागू शकला नव्हता. असा झाला उलगडा १२ जानेवारी २०१७ रोजी झाला खून २० सप्टेंबर २०२४ रोजी सीआयडीकडे गुन्हा वर्ग १६ आॅक्टोबर पुन्हा मुद्देमाल ताब्यात घेऊन फेरतपासणी ११ एप्रिल २०२५ हो... आम्हीच केला साबळेचा खून आठ वर्षांनंतर या प्रकरणाची फाइल पुन्हा उघडताच पोलिस उपअधीक्षक आर.एस. संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी टीम स्थापन करण्यात आली. त्यांनी कुटुंबीयांची नव्याने चौकशी केली, त्यातच एका गुप्त बातमीदारामार्फत सीआयडीच्या हाती महत्त्वाची माहिती लागली. संशयित आरोपी गणेश निकाळजे एमआयडीसी परिसरात अजूनही वावरतोय या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकत त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीत त्याने एक धक्कादायक खुलासा केला. हो, आम्हीच अमोल साबळेचा खून केला आणि त्याचे प्रेत रेल्वे पटरीवर फेकून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांचा मार्ग मोकळा झाला. नातेवाइकांनी सतत केला पाठपुरावा अमोलच्या नातेवाइकांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. महासंचालकांपर्यंत त्यांनी न्यायासाठी दाद मागितली होती. हा गुन्हा उलगडण्यासाठी तब्बल ८ वर्षांचा कालावधी उलटून गेला. असे जरी असले तरी आरोपींनी हा खून कशामुळे केला याचा उलगडा अद्यापही झाला नाही. दरम्यान, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PWL7eNk
सीआयडीच्या पथकाकडून एकाला अटक, तर 2 जण ताब्यात:मैत्रिणीच्या चौकशीतून उलगडले आठ वर्षांपूर्वीच्या खुनाचे गूढ
April 21, 2025
0