सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याच्या रागातून एका महिलेची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात ही बाब उघड झाली असून अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संबंधीच्या वृत्तानुसार, घनसावंगी तालुक्यातील टेंभी अंतरवाली गावातील मिराबाई बोंढारे या महिलेने शेताजवळ शेजारी राहणाऱ्या मुलाकडून फोन करण्यासाठी मोबाईल घेतला होता. मात्र, या महिलेकडून मोबाईल पाण्यात पडून खराब झाला. आपला मोबाईल पाण्यात पाडून खराब केल्याचा राग सातवीत शिकणाऱ्या मुलाला आला. या रागाच्या भरातच 13 वर्षीय मुलाने मिराबाई यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. अशी उघडकीस आली घटना घनसावंगी तालुक्यातील टेंभी अंतरवाली गावात 25 मार्च रोजी मिराबाई बोंढारे वय 41 या महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांकडून या खुनाचा तपास सुरू होता. संबंधित घटनेविषयी चौकशी सुरु असताना महिलेल्या शेताजवळ राहणाऱ्या मुलाची पोलिसांनी चौकशी केली. आपणच खून केल्याची कबुली या अल्पवयीन मुलाने पोलिस चौकशीत दिली. याप्रकरणी या मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. मोबाईलसाठी डोक्यात दगड घालून या मुलाने महिलेला संपवल्याच्या घटनेनंतर परिसर हादरला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/bgADwBU
मोबाईलवरून डोक्यात दगड घालून महिलेची हत्या:सातवीत शिकणाऱ्या मुलाचे कृत्य, जालन्यातील घटनेने खळबळ
April 01, 2025
0