पहलगाम हल्ल्यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करण्यास सुरू केली आहेच, त्यात आता केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांनी देशविरोधी आणि दहशतवाद्यांना समर्थन मिळेल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी एक पत्र देखील पाठवले आहे. त्यामुळे आता विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार? दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का?. काही पर्यटक म्हणत आहेत की हल्लेखोरांनी धर्म विचारला, तर काहींचे म्हणणे आहे की असे काही घडलेच नाही, असे विजय वडेट्टीावर यांनी म्हटले. त्यांच्या या विधानवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मुळात ही काँग्रेसचीच मानसिकता दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्यावर भाजप नेते व माजी आमदार राम सातपुते यांनी देखील टीका केली आहे. राम सातपुते म्हणाले, मुळात ही काँग्रेसचीच मानसिकता आहे. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी इस्लामिक आतंकवाद्यांनी हिंदूंच्या हत्या केल्या, त्यावेळेस अशा पद्धतीने संभ्रम करणारे वक्तव्य काँग्रेस नेते करतात, वडेट्टीवारांच्या तोंडून त्या ठिकाणी राहुल गांधी बोलले आहेत. पुढे बोलताना राम सातपुते म्हणाले, अशा पद्धतीची मानसिकता ही हिंदू विरोधी मानसिकता आहे. त्या ठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत. मारताना हिंदूंना धर्म विचारून, नाव विचारून पॅन्ट काढून अतिरेक्यांनी मारले आहे, याचे उत्तर मोदी सरकार येणाऱ्या काळात देईल. मात्र, दहशतवाद्यांना खतपाणी घालायचे काम अशा प्रवृत्ती करतात, मी याचा जाहीर निषेध नोंदवतो. अशा पद्धतीने बोलणे म्हणजे त्या ठिकाणी ज्यांचा जीव गेला आहे, त्यांचा अपमान करणारे आहे. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा- चित्रा वाघ कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे डोके ठिकाणावर आहे की नाही? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला पती, भाऊ तर कुणी आपला बाप गमावला आहे. संपूर्ण देशच नाही तर जगाला याचे दुःख वाटत आहे. ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले ते रडून आपबिती सांगत आहेत. हा दहशतवादी हल्ला हिंदूंचा नरसंहार होता हे स्पष्ट होत आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते हे सत्य नाकारत आहेत. काँग्रेसमधून रोज कुणी ना कुणी प्रसारमाध्यमांवर येऊन हल्ल्यातील मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना खोटं ठरविण्याची क्रुरचेष्टा करत आहेत. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे जनतेला देखील चांगलंच समजले आहे. राहुल गांधींपासून ते आज वडेट्टीवारांपर्यंत सगळ्यांना त्या दहशतवाद्यांचा इतका का पुळका आलाय? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. हेही वाचा
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/miJygsS
देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करा:केंद्रीय मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, भाजप आक्रमक
April 28, 2025
0