‘आज राज्यात जे काही घडत आहे ते भयंकर आहे. बीडमधील घटनेची चर्चा बरीच झाली. त्या तुलनेत परभणीत पोलिसांनी दलित युवकांवर केलेल्या अत्याचारावर कुणी बोलायला तयार नाही,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी रविवारी केले. दहाव्या अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या संमेलनात जातनिहाय जनगणना व्हावी, शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीची अंमलबजावणी होऊ नये, हिंदुस्तान या शब्दाऐवजी भारत वा इंडिया शब्दाचा प्रयोग व्हावा आदी ठराव मंजूर करण्यात आले. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूरतर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलताई देशमुख स्मृती सभागृह येथे संमेलन आयोजित केले होते. मंचावर संमेलनाध्यक्ष डॉ. श. नु. पठाण, वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झांसह इतर उपस्थित होते. महाराष्ट्रात दारूबंदी, जातनिहाय जनगणना करावी संमेलनादरम्यान काही ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या दहशतवादाचा निषेध करायला हवा, सर्व साहित्य संमेलनांना सरकारने निधी द्यावा, जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे, महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी, जातनिहाय जनगणना व्हावी, शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीची अंमलबजावणी होऊ नये, हिंदुस्तान या शब्दाऐवजी भारत वा इंडिया शब्दाचा प्रयोग व्हावा, धर्मनिरपेक्षतेची संकल्पना वृद्धिंगत होण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात यावेत, अल्पसंख्यकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे आदींचा समावेश आहे. या वेळी इतर मागण्याही करण्यात आल्या.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/cuTiJ4I
अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात ठराव:‘हिंदुस्तान’ऐवजी आता ‘भारत’ किंवा‘इंडिया’ या शब्दांचा प्रयोग करण्यात यावा
April 27, 2025
0