डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्वच वेगळे आहे. त्यांना समजून घेताना किंवा त्यांच्याविषयी वाचताना त्यांचे अनेक नवनवे पैलू उलगडतात. बाबासाहेबांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. सुरुवातीच्या काळात स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष केला. यातून ते स्वतः उभे राहिले परंतु समाज अद्यापही मागेच राहिला होता. लहान वयातच त्यांनी शिक्षण हे एका ध्येयासाठी निश्चित केले होते आणि त्यानुसारच त्यांनी शैक्षणिक वर्षांमध्ये एक क्षणही व्यर्थ न घालवता केवळ अभ्यास केला. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी शिक्षणच महत्त्वाचे आहे हे बाबासाहेबांना कळून चुकले होते. देशात त्याकाळात असलेली समाज व्यवस्था व ब्राह्मण्यवादाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. हा आवाज ठराविक समाजाच्या विरोधात नव्हता, तर हा आवाज होता विचारधारेच्या विरोधात, समाजरचनेच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधात, मानवी विषमतेच्या विरोधात. भारतातील समाजरचना भारतात समाजरचना ही वर्णव्यवस्थेवर आधारित आहे. तसेच हिंदू समाजाचे चार विभाग पाडण्यात आले आहेत. सुरुवातीच्या काळात याच चार प्रमुख विभाग होते. मात्र त्यानंतरच्या काळात याच विभागांच्या चार जाती बनल्या आणि नंतर या चार जातींच्या हजारो जाती बनत गेल्या. त्यानुसार सध्याची असलेली जातीव्यवस्था ही प्राचीन वर्णव्यवस्थेची उत्क्रांती आहे, असे आपण म्हणू शकतो. मात्र, वर्णव्यवस्थेचा अभ्यास करून जातीव्यवस्थेची कल्पना येणार नाही. म्हणून वर्णपद्धती बाजूला ठेऊनच जातीव्यवस्थेचा अभ्यास करावा लागेल, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. भारतात जाती संस्थेच्या प्रभावामुळे, प्राबल्यामुळे विषमता अधिकाधिक वाढत गेली. हिंदू समाजरचनेची ही साचेबंद कसोटी भारतातील विषमतेला बळकट करण्यास कारणीभूत ठरली. हिंदू समाज रचनेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दर्शवले आहे की, हिंदू समाज संरचना ही अन्यायपूर्ण संबंधांवर आधारित आहे. त्यांच्या मते जातीवाद ही राष्ट्रविरोधी शक्ती आहे. भारतीय समाज जातीबद्ध असल्याने मानवी गुण व नितीमत्ता ही जातीबद्ध होताना दिसते. बाबासाहेबांनी अनेक आंदोलने जनजागृती, वृत्तपत्र लिखान, घटनात्मक तरतुदी केल्या व आपले संपूर्ण आयुष्य मानवतावाद प्रस्थापित करण्यात घालवले. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, 15 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणात म्हटले होते की, "हिंदू धर्म सोडण्याची चळवळ आम्ही 1955 मध्ये हाती घेतली होती, जेव्हा येवला येथे एक ठराव करण्यात आला होता. जरी मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. ही शपथ मी आधी घेतली होती; काल, मी ती खरी सिद्ध केली. मी आनंदी आहे. मला कोणतेही आंधळे अनुयायी नको आहेत. जे बौद्ध धर्मात येतात त्यांनी समजूतदारपणे यावे; त्यांनी जाणीवपूर्वक तो धर्म स्वीकारला पाहिजे." तसेच कम्युनिस्टांवर टीका करताना त्यांना उद्देशून म्हणाले होते की, कार्ल मार्क्सच्या लिखाणामुळे एक पंथ उदयास आला आहे हे मला माहिती आहे. त्यांच्या मतानुसार, धर्माचा अर्थ काहीच नाही. त्यांच्यासाठी धर्म महत्त्वाचा नाही. मी त्या मताचा नाही. मानवजातीच्या प्रगतीसाठी धर्म ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, हिंदू समाजाची रचना श्रेणीबद्ध असमानतेच्या सिद्धांतावर आधारित आहे. प्रत्येक जात ही तिच्या खालच्या जातीपेक्षा श्रेष्ठ व वरच्या जातीपेक्षा कनिष्ठ आहे. ही हिंदू समाजातील असमानता गुण, कर्म व भेद यावर आधारित परिवर्तनामधील नाही तर ती जन्माच्या आधारावर अपरिवर्तनीय आहे. ही सामाजिक असमानता केवळ जातीच्या स्थितीमध्येच नाही तर त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती विशेषधिकाराच्या वितरण व्यवस्थेमध्येही आहेत. श्रेष्ठ जातींना त्यांच्या श्रेणी क्रमानुसार विशेषाधिकार व सवलती मिळाल्या आहेत. तर कनिष्ठ जातीवर त्यापेक्षा कितीतरी जास्त नियम व बंधने लादली आहेत. सर्वात खालच्या जातींना पशुपेक्षाही हीन वागणूक दिली जाते. भारतातील जातीची घडण, उत्पत्ती आणि प्रसार या संदर्भात आपला सिद्धांत मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंतर्गत विवाहाला विरोध केला आहे. त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. बाबासाहेबांच्या मते, जातीअंतर्गत विवाह म्हणजे समाजातील सामाजिक विषमतेला आणि जातीभेदाला समर्थन देणे होत, ज्यामुळे समाजात एकसंधता कमी होते. त्यांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याची आणि एक नवीन, समानता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्याची गरज व्यक्त केली, ज्यात जातीचे बंधन नसेल. देशाला भलेही इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळेल, परंतु देश तोपर्यंत स्वतंत्र नाही होणार जोपर्यंत भारतातून जातीव्यवस्था संपुष्टात येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाज रचनेच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि हिंदू समाजातीलच भाग असलेल्या दलित समाजाला हिंदू धर्म सोडून देण्यास सांगितला. परंतु असा कोणता वर्ग आहे जो या दलित समाज बांधवांना सामावून घेऊ शकेल असा प्रश्न उपस्थित राहिला होता. याच प्रश्नाचे उत्तर शोधत शोधत अखेर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत जवळपास 3 लाख दलीतांनी हिंदू धर्म सोडून बौध्द धर्म स्वीकारला. 14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मातच जन्माला आले होते. परंतु या लेखाच्या सुरुवातीला सांगितले त्यानुसार बाबासाहेबांना हिंदू समाजातील वर्णव्यवस्थांचा विरोध होता. हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करणे, हिंदू धर्माची मानहानी आणि अवनती रोखणे आंबेडकरांना अपेक्षित होते. 'अॅनिहीलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवर कडाडून टीका केली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणांमधून देखील हिंदू धर्मातील या रूढी परंपरांवर टीका केली आहे. असे असताना देखील बाबसहेबांनी अगदी आयुष्याच्या शेवटी बौद्ध धर्म का स्वीकारला? असा प्रश्न उपस्थित होतो. यावर उत्तर देताना सामाजिक कार्यकर्त्या रुपा कुलकर्णी बोधी म्हणतात, "त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस.एम जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती. अनेक वर्तमानपत्रे केली. त्यातून सवर्ण समाजाचे प्रबोधन केले. ती वापरत असताना सद्हेतुने कान उघडणी केली. 1942 पासून तर ते राजकारणातही होते. घटनाही लिहिली. घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते. तरीही त्यांचे समाधान झाले नाही. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला." बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. या भाषणात बाबासाहेब म्हणाले, मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेला नाही, मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन. मला बौद्ध धर्म आवडतो कारण.. 1956 च्या मे महिन्यात बाबासाहेब आंबेडकरांचे एक भाषण प्रसिद्ध करण्यात आले होते. यात मला बौद्ध धर्म का आवडतो या प्रश्नाचे उत्तर बाबासाहेबांनी दिले आहे. बाबासाहेब म्हणतात, "मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात.बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे." मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथे बौद्ध धर्म स्वीकारताना त्यांच्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा घ्यायला लावल्या. बाबासाहेबांनी घेतलेली व घ्यायला लावलेली ही प्रतिज्ञा कुठल्या द्वेषातून नव्हती. रुपा कुलकर्णी बोधी याविषयी सांगतात, "या प्रतिज्ञा देणे म्हणजे गणपतीचा किंवा विष्णूचा अपमान करणे हे प्रयोजन नव्हते. तर मूर्तीपूजा, कुलदेवता वगैरे मानणे, कर्मकांड, चमत्कारांच्या आहारी जाणे यातून त्यांना आपल्या समाजाला सोडवायचे होते. बाबासाहेबांनी या सगळ्यांतला फोलपणा जाणला होता. त्यांना लोकांना एक चांगल जीवन जगण्याचा मार्ग द्यायचा होता. ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि दलित पँथरचे सहसंस्थापक अर्जुन डांगळे सांगतात की "लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यावर पुन्हा जुन्या विचारांकडे वळणे बाबासाहेबांना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी या प्रतिज्ञा दिल्या. आपण एक वेगळा जीवनमार्ग निवडतो आहे, हे त्यांना दाखवून द्यायचे होते. बौद्ध धम्माचा स्वीकार म्हणजे द्वेषावर आधारीत व्यवस्था नाकारणे हे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. बाबासाहेबांचा एकूण जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन लोकशाहीवादी, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक होता.” पुढे ते म्हणतात, "ज्या माणसांना इथल्या धर्माने आणि व्यवस्थेने माणूसपणाची वागणूक दिली नाही किंवा सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा दिली नाही, त्या माणसांना एक नवी ओळख देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. त्यामुळे त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करणे हे केवळ धर्मांतर नव्हते, तर ती एक सामाजिक क्रांती होती. धर्माची मानसिक गुलामगिरी नाकारण्यासाठी या प्रतिज्ञा आहेत."
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/pOHGhSr
मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी का सोडला हिंदू धर्म? बौद्ध धर्मच स्वीकारण्याचे कारण काय?
April 13, 2025
0