Type Here to Get Search Results !

कौटुंबिक वादातून केले कृत्य पतीस पोलिसांकडून अटक:अकोल्यात पत्नीसह तीन वर्षीय सावत्र मुलीची हत्या

कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व तीन वर्षीय सावत्र मुलीची गळा आवळून हत्या केली. ही घटना रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तारफैल भागात शनिवारी दुपारी घडली. आरोपी पतीने हत्येची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सूरज गणवीर ऊर्फ गोट्या (३५) असे आरोपी पतीचे नाव आहे, तर पत्नी अश्विनी य (२५) व सावत्र मुलगी आयशा (३) अशी मृतांची नावे आहेत. सूरज हा केटरिंगचे काम करायचा. त्याचे आधी लग्न झाले होते. मात्र पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यानंतर त्याने काही दिवसांपूर्वी अश्विनीसोबत लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून सूरज आणि अश्विनी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत होते. त्यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. त्यामुळे पत्नीला कायमचे संपवण्याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. शनिवारी पुन्हा पत्नी अश्विनी व त्याच्यात भांडण झाले. या वेळी त्याने घरातच पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ३ वर्षीय मुलगी आयशा हिचाही गळा आवळला. त्यात तीसुद्धा गतप्राण झाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या वेळी त्यांना घरामध्ये मायलेकी मृतावस्थेत दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी दोघींचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. हत्येनंतर दिली स्वत: पोलिसांना माहिती हत्येनंतर आरोपी सूरजने पोलिसांना फोन केला आणि आपण पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर रामदासपेठ पोलिस घटनास्थळी पोहोचले तर आरोपी हा घरात बसलेला होता. पोलिसांना त्याने आपणच गळा आवळून पत्नी व मुलीची हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पत्नी नेहमी भांडत असे, त्यामुळे तिला संपवल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. नेमके आणखी काही कारणे आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/UtGi7Wc

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.