Type Here to Get Search Results !

पाऊले चालती.. पंढरीची वाट..:सर्वांना सामावून घेणारी पंढरीची वारी कशी सुरू झाली? एवढ्या मोठ्या संख्येने भक्तगण का येतात? जाणून घ्या

ना जात, ना धर्म, ना पंथ... सर्वांनी एकत्र येऊन, तहान - भूक विसरून भक्तीत तल्लीन झालेले माऊलीचे वारकरी...ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम म्हणत आयुष्यात असलेल्या दुःखाला बाजूला सारून, डोक्यावर उन आहे की अंगावर पावसाच्या धारा याचे भान विसरून. डोक्यावर तुळस, हातात टाळ आणि गळ्यात मृदूंग घेऊन अनवाणी पांडुरंगाच्या नामजपात तल्लीन होऊन चालत जाणे म्हणजेच वारी. माऊलीची भक्ती करता यावी ही अपेक्षा मनात बाळगून मागील अनेक वर्षांपासून वारीची परंपरा आपल्या मातृभूमीत अविरतपणे सुरू आहे. या वारीची पार्श्वभूमी काय आहे? वारीची सुरुवात कशी सुरू झाली? त्याचे कारण काय? आणि यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने भक्तगण का येतो? जाणून घेऊयात दिव्य मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये... वारीची सुरुवात कशी झाली? महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक अभिन्न भाग म्हणजे वारी – भक्तीचा, समर्पणाचा आणि समत्वाचा एक जीवनप्रवाह. वारी म्हणजे केवळ तीर्थयात्रा नाही; ती आहे आत्मिक प्रवासाची, मानवतेच्या मूल्यांची आणि समाजिक समरसतेची सजीव साक्ष. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. ही यात्रा जशी आध्यात्मिक आहे, तशीच ती सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत समृद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी या वारीचा प्रारंभ ८०० वर्षांपूर्वी केला होता. वारीची परंपरा साधारणतः १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी सुरू केली, असे मानले जाते. वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी आपल्या भावंडांबरोबर पंढरीच्या वारीच्या परंपरेला दिशा दिली. यानंतर संत तुकाराम महाराजांनी १७ व्या शतकात आपल्या पालखीच्या रूपात वारीला सामाजिक चळवळीचे रूप दिले. वारीचा खरा उद्देश म्हणजे भक्तीमार्गाची वाट जनसामान्यांसाठी खुली करणे. त्याकाळी वर्णाश्रमी व्यवस्था आणि कर्मकांडांमध्ये अडकलेल्या समाजाला संतांनी भक्तीमार्गाने एक नवा श्वास दिला. वारी ही त्या भक्तीमार्गाचे प्रगटीकरण आहे. १६८५ मध्ये तुकारामांच्या धाकट्या सुपुत्राने म्हणजेच नारायण महाराज यांनी पालखी परंपरेची सुरुवात केली. वारीमध्ये प्रमुख दोन पालख्या असतात संत तुकाराम महाराजांची देहू येथून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी येथून. सुरुवातीला संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि संत तुकारामांच्या पादुका एकत्र पालखीत ठेवून वारी सुरू केली गेली होती. वारीला पालखीची जोड देण्याचे काम तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायणबाबा यांनी केले. नारायणबाबांकडे त्या काळातील वारकरी संप्रदायाचे नेत्तृत्व होते, असे म्हटले तरी चालेल. तुकारामपुत्र म्हणून त्यांना सर्वत्र मान होता. छत्रपती राजाराम महाराज, शाहू महाराज व मराठा मंडळातील सेनापती, सरदारांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्या आधारे त्यांनी लहान देहू देवस्थानचे रुपांतर मोठ्या संस्थानमध्ये केले. देहूला वारकरी पंथाचे मुख्य केंद्र बनवले. नारायणबाबांच्या हाती जेव्हा देवस्थानाची सूत्रे आली, तेव्हा त्यांना जाणवले की, वारकऱ्यांना नुकतेच वैकुंठप्रयाण केलेल्या तुकोबांचा विरह जाणवत होता, पण तरीही तुकोबांच्या स्मृती ताज्या होत्या. ज्ञानोबा तर वारकरी पंथाचे प्रेरणास्थान होते. नारायणबाबांना स्फूर्ती झाली, की आपण प्रतिवर्षी पंढरीची वारी करतो; दिंडी घेऊन जातो. ही वारी ज्ञानोबा-तुकोबांच्या बरोबर का करू नये? हे संत जरी देहरूपाने आपल्या समवेत नसले, तरी प्रतीकात्मतरित्या आणि नामरूपाने असू शकतात. मग त्यांची पालखी सज्ज करून तिच्यात तुकाराम महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली. ही पालखी मिरवीत ते आळंदीला गेले. तेथे त्याच पालखीत ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवल्या. पुढची वाटचाल नारायणबाबांच्या पश्‍चात वारी-पालखीची ही परंपरा अशीच चालू राहिली. मात्र, 1832 च्याच दरम्यान देहू देवस्थानाचे मालक असलेल्या तुकोबांच्या वारसदारांमध्ये भाऊबंदकी सुरू झाली. तिचा परिणाम वारीवर होण्याची शक्‍यता बघून काही सूज्ञ मंडळींनी ज्ञानेश्‍वर महाराजांच्याच पालखीचा सोहळा आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. तर संत तुकारामांची पालखी देहूहून पंढरपूरला निघू लागली. ते पाहून पुढे इतरही संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या गावांमधून निघू लागल्या. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून निघते आणि पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, माळशिरस, शेगाव, वाखरी मार्गे पंढरपूरला पोहोचते. संत तुकारामांची पालखी देहूहून निघते आणि आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी मार्गे पंढरपूरला पोहोचते. या मार्गावर विविध ठिकाणी मुक्काम केला जातो, जिथे वारकऱ्यांसाठी जेवण, विश्रांती आणि इतर सोयी-सुविधा पुरवल्या जातात. २१ दिवसांचा प्रवास करून ह्या दोन पालख्या पंढरपूरला जाऊन आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी पोहोचतात. या यात्रेला "आषाढी वारी" असे म्हणतात. आषाढी एकादशी केवळ धार्मिक उत्सव नाही, तर ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक आहे. या दिवशी विविध समाजातील लोक एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने व्रत पाळतात आणि भक्तिरसात न्हालेल्या गजरात सहभागी होतात. वारीच्या मार्गावर विविध ठिकाणी स्थानिक संस्कृती, परंपरा आणि कला प्रकट होतात, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होते. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगरचनेत वारकर्‍यांची महती गात वारीचा समाजिक आधार मजबूत केला. ते म्हणतात, तुका म्हणे, पंढरीसी जावे। विठोबा रावासी सदा गावे॥ या ओळी वारीतील आत्माराम भाव मांडतात. १८३० साली ह.भ.प. शेठ रामचंद्रबुवा चाफेकर यांनी पहिल्यांदा संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरकडे निघण्याची परंपरा सुरू केली. त्यानंतर ही परंपरा दरवर्षी नियमितपणे चालू राहिली. १९६० नंतरच्या काळात राज्य सरकार आणि अनेक सेवाभावी संस्था वारी व्यवस्थापनात सहभागी होऊ लागल्या. जप, तप, ध्यान, धारणा या एकट्याने करण्याच्या गोष्टी आहेत. मात्र वारी ही समूहाने एकत्र येऊन करायची असते. म्हणजेच ते म्हणतात ना, 'एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।' अगदी या प्रमाणेच महाराष्ट्रातीलच नव्हे, तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही ही वारी निघते. यामध्ये हजारो वारकरी सामील होतात. वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे वारी ही सर्व समावेशक आहे. म्हणजेच काय तर, वारीमध्ये गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत वारकरी सहभागी होतात. यामध्ये ना तुमचा पंथ विचारला जातो ना ही लिंग. यावर संत साहित्याचे अभ्यासक दत्तात्रय डुंबारे म्हणतात, " वारकरी संप्रदायामध्ये जातीला, वर्गाला फाटा फोडण्याचे काम केले आहे. जी ज्ञान सत्ता एका ठराविक वर्गाकडे केंद्रित झाली होती, ती ज्ञान सत्ता काढून ज्ञान देण्याचा अधिकार नामदेवाला दिला. त्यामुळे अठरा पगड जाती- जमाती यामध्ये समाविष्ट होतात आणि हेच वारीचे मुख्य वैशिट्य आहे." वारकऱ्यांच्या प्रत्येक कीर्तनाचा व भजनाचा समारोप ज्या अभंगाने होतो, तो सर्व प्रसिद्ध आहे. हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा। गुण गाईन आवडी। हीच माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि संपदा। संतसंग देई सदा। तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी।। म्हणजेच मनुष्य जन्माची महती सांगत तो वारंवार हवा असल्याचे सांगणारा हा वारकरी संप्रदाय आहे. आवडी न पुरे सेविता न सरे। पडियेली धुरेसवे गाठी।। न पुरे हा जन्म हे सुख सेविता। पुढती ही आता हेचि मागो।। वारी नेमकी आहे तरी काय? तर ज्येष्ठ लेखक व प्रवचनकार सदानंद मोरे याबाबत लिहितात, "हे परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव किंवा “सेलिब्रेशन’ आहे. पंढरपूरला जायचे ते एकट्याने नव्हे आणि गूपचूपही नव्हे. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशा प्रकारे पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला दिंडी म्हणतात. दिंडीत पाच, पंचवीस, शंभर, पाचशे, हजार, पाच हजार इतके म्हणजे कितीही लोक असू शकतात. दिंडीत चालणाऱ्या अशा लोकांचा प्रमुख किंवा संचालक असतो त्याच्या गळ्यात वीणा असतो. तो सूत्रधार असून, दिंडी त्याच्या इशाऱ्याने चालते." आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही ही वारीची परंपरा तितकीच महत्वाची मानली जाते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत 'रामकृष्ण हरी' चा जाप करत, पाऊली खेळत पंढरपूरचे द्वार कधी ओलांडले जाते ते समजत नाही. महाराष्ट्राच्या लोकसंगीताची, साहित्याची आणि नाट्यपरंपरेची वाहक म्हणजे ही वारी. अभंग, ओव्या, भारुडे, कीर्तन, पोवाडे या सगळ्यांतून वारकरी परंपरेचा ठसा उमटतो. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, जनाबाई, बहिणाबाई इत्यादी संतांचे विचार अजूनही या वारीतून जिवंत राहतात. आजही ही परंपरा लाखो लोक श्रद्धेने पाळतात. वारीमध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत आहे. अनेक सामाजिक संस्था, डॉक्टर्स, स्वयंसेवक वारीत सहभागी होऊन आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक विरोधी उपक्रम राबवतात. त्यामुळे वारी ही केवळ धार्मिक यात्राच न राहता, एक सामाजिक जागृतीचे आंदोलन बनले आहे. 2020 मध्ये कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर वारीवर निर्बंध आले होते, परंतु त्यानंतर 2022 पासून ही परंपरा पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. दरवर्षी या दिवशी महाराष्ट्र सरकारकडून खास कार्यक्रम आयोजित केले जातात. मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर विठोबा रुक्मिणीचे दर्शन घेतात. आणि महाराष्ट्राच्या सुखासाठी प्रार्थनाही करतात. ही वारी ऐसेची राहावी म्हणत हजारो वर्ष जुनी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते आणि ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजराने संपूर्ण आसमंत न्हाऊन निघतो.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QVHU8ES

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.