Type Here to Get Search Results !

नवे धोरण:दोघांत तिसरा नको- उद्धव ठाकरे, राज्यातील मनसेविरोधी काँग्रेस नेत्यांना फटकारले

उद्धव ठाकरेंनी मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांत मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेस मविआतून बाहेर पडणार, असे राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरेंनी या काँग्रेस नेत्यांची थेट राहुल गांधींकडे दिल्लीत जाऊन तक्रार केली. आमच्या दोघांत म्हणजे उद्धवसेना आणि मनसेत युती ठरवण्यासाठी तिसरा नको, अशी भूमिका त्यांनी राहुल यांच्याशी भेटीत घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. पत्रकारांशी या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, मनसेसोबतच्या युतीसाठी तिसऱ्या कुणाचीही गरज नाही. आम्ही दोन भाऊ कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत. त्यांच्या या भूमिकेमुळे, मनसेसोबतच्या संभाव्य युतीचा निर्णय पूर्णपणे त्यांचा आणि राज ठाकरेंचा असेल हे स्पष्ट झाले आहे. मुख्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना धुडकावून लावले आहे. यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी काही मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंना विरोध केला होता. तेव्हाही त्यांनी खासदार संजय राऊत यांना निरोप देऊन थेट राहुल गांधींकडे तक्रार केली. आणि या नेत्यांची खरडपट्टी काढवून घेतली होती. तोच पॅटर्न त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वापरणे सुरू केले आहे. हिंदी भाषा सक्तीविरोधात यश मिळवल्यानंतर ठाकरे बंधू एकत्रीकरणाची मोहीम वेगवान करण्यात आली आहे. २० वर्षांपूर्वी उद्धव आणि त्यांच्या नेत्यांच्या राजकारणाला त्रासून राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते. तो त्रास विसरून राज यांनी भावासोबत संधान बांधण्याची तयारी केली आहे. राज यांनीही ४ ऑगस्ट रोजी आपल्या कार्यकर्त्यांना “मतभेद विसरून एकत्र या” असा संदेश दिला होता. “वीस वर्षांनंतर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का नाही?” असे सूचक विधान करत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले. मात्र, राज यांना मविआत घेण्यास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. राज यांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका दलित-मुस्लिमबहुल भागात अडचणीची ठरेल, असे त्यांना वाटते. मात्र, त्यांना आळा घालण्यासाठी उद्धव यांनी थेट राहुल यांना साकडे घातले आहे. राहुल यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतीलच आणि काँग्रेसही मुंबई, पुणे, ठाणे मनपात ठाकरे बंधूंसोबत असेल, अशी शक्यता वाढली आहे. चव्हाण, सपकाळांना धक्का देण्याची रणनीती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मनसेला सोबत घेण्यास कडाडून विरोध आहे. दोन-तीन वेळा बोलणी झाल्यावरही हे दोघे ऐकत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना धक्का देण्याची रणनीती उद्धव यांनी आखली. त्यांनी राहुल यांना सांगितले की, मुंबईत दलित, मुस्लिम, ओबीसी, उत्तर भारतीय आणि मराठी भाषिक मतदार मोठ्या संख्येने भाजप विरोधात आहेत. आता फक्त भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळावे लागेल. शरद पवारांच्या सूचनेवरूनच काँग्रेस नेत्यांविरुद्ध तक्रार सूत्रांनी सांगितले की, महापालिकेत उद्धव आणि राज ठाकरेंची युती झालीच पाहिजे, असा शरद पवारांचा आग्रह आहे. त्यांच्या सूचनेवरूनच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांबद्दलची तक्रार राहुल गांधींकडे केली आहे. राज यांना सोबत घेतल्यास मुंबई मनपात मोठा फायदा होईल. राज आगामी काळात हिंदुत्वावर मोठे वक्तव्य करणार नाहीत. ते भाजप आणि गुजरात, हिंदीविरोधात आक्रमक आघाडी उघडतील. त्यामुळे मविआच्या दलित, मुस्लिम व्होट बँकेला धक्का लागणार नाही, असे उद्धव यांनी राहुल यांना पटवून दिले. मुंबई मनपात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज यांची प्रचंड आवश्यकता आहे, असेही त्यांनी वारंवार सांगितले. ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, सध्या देशात पंतप्रधान, गृहमंत्री किंवा संरक्षणमंत्री नसून केवळ भाजपचे प्रचारमंत्री काम करत आहेत. हे सरकार देशाच्या हितापेक्षा पक्षाच्या प्रचाराला अधिक महत्त्व देत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताची खिल्ली उडवत असतानाही सरकार गप्प का? सरकारचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देशभक्तीच्या गप्पा मारणारे भाजपचे नेते स्वतःच दुबईत जाऊन पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतात. हे खरे देशभक्त नाहीत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/m4QO7kC

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.