पर्वती पायथ्याजवळील जनता वसाहतीतील टोळीयुद्धाचा उद्रेक झाला असून त्यातून मंगळवारी ( दि. ४) भरदुपारी तीन वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबाग परिसरात एका किशोरवयीन मुलाचा कोयत्याचे वार करून निर्घृण खून करण्यात आला. यासदंर्भात तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहराच्या मध्यवस्तीत ऐन रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी वेगवान तपास करत तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या हल्ल्यात मयंक नावाचा १७ वर्षीय युवक जागीच मरण पावला. हा हल्ला एवढा भयंकर होता, की रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा थरकाप उडाला. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या खुनानंतर मध्यवस्तीतील वाहतूक विस्कळीत झाली होती. मयंक हा मूळचा जनता वसाहत परिसरातील रहिवासी आहे. त्याची आई पुणे महापालिकेत नोकरीला असून त्यांना काही महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेच्या साने गुरुजी वसाहतीत खोली मिळाली. त्यामुळे हे कुटुंब या वसाहतीत वास्तव्याला आले. मात्र, मयंकचा वावर जनता वसाहतीतच अधिक होता. त्या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून गुंडगिरी वाढली असून तेथील टोळीयुद्धात गेल्या दोन वर्षांत तीन जणांचा बळी गेला. तसेच दहाहून अधिक जण जायबंदी झाले आहेत. तेथील काही गुंडांशी मयंक याची भांडणे झाली होती. त्यातून दोन दिवसांपूर्वी मयंकच्या मित्रांनी एकाला मारहाण केली होती. त्यामुळे तेथील काही जण त्याच्या मागावर होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Lrt9e2m
पुण्यात किशोरवयीन मुलाचा कोयत्याने हल्ला करून खून:कोयत्याचे वार वर्मी बसल्याने मृत्यू, 3 अल्पवयीन आरोपी ताब्यात
November 04, 2025
0