संपूर्ण राज्यभरामध्ये रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा सुरू असताना या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्यात आला. मुरगुड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ९ जणांना ताब्यात घेतले आहे. सदरच्या टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून मुरगुड पोलिस या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी शिक्षकांनी परीक्षा दिली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला. ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. सर्व संशयितांना कागल तालुक्यातील सोनगे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले सर्व जण कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात वाढू शकते. दरम्यान,राज्यात २८९३९ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. जळगावात परीक्षेसाठी आलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू जळगाव | टीईटी परीक्षेला आलेल्या पाचोऱ्याच्या शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. परीक्षेला जाण्यापूर्वी जळगाव शहरातील परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या झेरॉक्सच्या दुकानावर आयडीची झेरॉक्स काढत असताना ही घटना घडली. परीक्षेच्या तणावातून शिक्षकाचा बळी गेल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. संदीप प्रल्हाद पवार (४०, रा. बिल्दी, ता. पाचोरा) असे शिक्षकाचे नाव आहे. ते सध्या तलाठी कॉलनीजवळील अष्टविनायकनगरमध्ये वास्तव्यास होते. ते लाख तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक विभागात ऑक्टोबर २००५ पासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी जळगाव शहरातील ए.टी. झांबरे विद्यालयात त्यांची टीईटीची परीक्षा होती. ते मित्रासोबत आपल्या मोटारसायकलवर परीक्षा देण्यासाठी आले होते. सकाळी १०.३० वाजता पेपर होता. त्यासाठी सकाळी ७ वाजताच पाचोऱ्याहून निघाले. ८.३० वाजता जळगावात पोहोचले. मु.जे. महाविद्यालयासमोर असलेल्या झेरॉक्स दुकानावर ओळखपत्राची झेरॉक्स काढण्यासाठी गेले. तेथे त्यांना खोकला आला व छातीत कळ येऊन ते खाली कोसळले. दुकानदाराने त्यांना उचलले. याच वेळी समोरून जाणारी पोलिसांची गाडी थांबली. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. बीड जिल्ह्यात ६ विद्यार्थ्यांनी लिहिली चर्चा करून उत्तरे राज्यात एकूण ४७५६६९ परीक्षार्थी हाेते. त्यापैकी पेपर एकसाठीच्या २०३३३४ पैकी १९०८९७ परिक्षार्थींनी परीक्षा दिली, तर १२४३७ गैरहजर राहिले. पेपर दाेनसाठी २७२३३५ पैकी २५५८३३ परीक्षा दिली, तर १६५०२ गैरहजर राहिले. एकूण गैरहजर परीक्षार्थींचे प्रमाण ६.९ टक्के राहिले, तर ९३.९४ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पेपर १ साठी ५७१ तर पेपर २ साठी ८५२ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते. कॅमेऱ्याचे थेट प्रक्षेपण कंट्रोल रूममध्ये हाेत हाेते. पुण्यातील कंट्रोल रूममधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील एका केंद्रावर २ व बीड जिल्ह्यातील एका केंद्रावर ६ विद्यार्थी सातत्याने चर्चा करून प्रश्नांची उत्तरे’ लिहीत असल्याचे दिसून आले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KOLEW9z
कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेले नऊ जण ताब्यात:शिक्षकही सहभागी, ताब्यात घेतलेले सर्वजण कागल आणि राधानगरी तालुक्यातील
November 23, 2025
0