आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा राजकारणातील सद्यस्थितीवर बोट ठेवत राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत. "सध्या देशात सुरू असलेले जातीपातीचे राजकारण पाहून जीव गुदमरतोय. जातीच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मतांमधून जागा दाखवा," असे रोखठोक आवाहन नाना पाटेकर यांनी तरुणांना केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात आयोजित 'असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज'च्या ३९ व्या आंतर-विद्यापीठीय युवा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि सैनिकांची स्थिती यावर मनमोकळे भाष्य केले. तरुणांनो, केवळ गर्दीचा भाग होऊ नका! सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना नाना म्हणाले की, "आजूबाजूचे वातावरण पाहून खूप अस्वस्थ व्हायला होते, अक्षरशः दम गुदमरल्यासारखे वाटते. काही राजकारणी केवळ जातीपातीचे राजकारण करत आहेत. 'तू अमुक जातीचा, तू तमुक जातीचा' असे सांगून लोकांमध्ये भेद निर्माण केले जात आहेत. मी स्वतः कधीही जात मानली नाही, पण आज दुर्दैवाने जातीचेच राजकारण जोरात सुरू आहे." यावेळी नाना पाटेकर यांनी तरुणाईला सतर्क राहण्याचा सल्ला दिला. जातीपातीचे राजकारण कोण करतंय आणि कसं करतंय, हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे केवळ कोणाच्या तरी सभेतील गर्दीचा भाग होऊ नका, असे ते म्हणाले. देशात बदल घडवण्याची ताकद तुमच्यात आहे. जातीचे राजकारण करणाऱ्यांना तुमच्या मतदानातून चोख उत्तर द्या, असे आवाहन नाना पाटेकर यांनी मतदारांना केले. सैनिकांच्या सन्मानाची खंत आपल्या भाषणात नाना पाटेकर यांनी सैनिकांच्या सन्मानाचा मुद्दा अतिशय भावुक होऊन मांडला. 'प्रहार' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, मी 'प्रहार'च्या वेळी 3 वर्षे सैनिकांसोबत सीमेवर राहिलो आहे. तिथे ऊन-पावसाचा विचार न करता तरुण मुले हातात रायफल घेऊन निधड्या छातीने उभी असतात. ते आपल्यासाठी तिथे मरायला तयार असतात, पण आपल्या देशात त्यांना हवा तसा सन्मान मिळत नाही, याची मला प्रचंड खंत वाटते. नाना पाटेकर म्हणाले, बाहेरच्या देशात एखादा सैनिक समोर आला तर स्वतः राष्ट्राध्यक्षही उभे राहून त्यांना सॅल्युट करतात. आपल्याकडे मात्र तशी संस्कृती दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हे ही वाचा... अजित पवार जबाबदार नेते, पण बोलताना तारतम्य ठेवणे गरजेचे:प्रचारावेळी कोण काय बोलतो ते फारसे महत्त्वाचे नाही- चित्रा वाघ अजित पवार हे जबाबदार नेते आहेत, पण प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, माझ्या सारखी कार्यकर्ता अजित पवारांना काय सांगणार, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मी त्यांच्यासोबत काम केले आहे, त्यामुळे सर्वच कार्यकर्ते अन् नेत्यांनी तारतम्य ठेवून बोलले तर ते जास्त बरे राहील. सविस्तर वाचा...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5UopNz9
जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना मतदानातून जागा दाखवा:नाना पाटेकरांचा तरुणांना कानमंत्र, सैनिकांच्या उपेक्षेवरही खंत व्यक्त
November 25, 2025
0