Type Here to Get Search Results !

दोन्ही भाऊ एकत्र आले तरी मुंबईत महायुती जिंकेल:संजय गायकवाड यांचा दावा; ठाकरेंची युती स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी - जयकुमार गोरे

आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर युतीची अधिकृत घोषणा केली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खूप वर्षांनी दोघे भाऊ एकत्र आले आहेत. दोघांतील वैर संपले आहे. दोघे भाऊ एकत्र आल्याने दोघांनाही शुभेच्छा. पुन्हा कधी दोघांनी भांडू नये. तसेच दोन्ही भाऊ एकत्र आले तरी मुंबईत महायुती ताकदीने लढेल आणि जिंकेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. संजय गायकवाड म्हणाले, मराठीचा महापूर आम्ही पण करणार आहोत. ज्यांचे लोक जास्त निवडून येतील त्याचा महापौर होणार आहे. 227 पैकी 150 जागा भाजप शिवसेना युतीला मिळतील. मुंबईकर आमच्या पाठीशी उभा राहील. एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांवर उभी आहे. 25 वर्षांपासून ज्यांच्या हाती सत्ता दिली ती आता मुंबईकर ठेवणार नाहीत, असे गायकवाड म्हणाले. ठाकरे बंधू अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले- जयकुमार गोरे दरम्यान, दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या जनतेसाठी, विकासासाठी एकत्र आले नाहीत, तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर केली आहे. ते म्हणाले, आपले अस्तित्व संपत चालले आहे, त्यामुळे एकत्र येऊन अस्तित्व टिकवण्यासाठी हे एकत्र आले आहेत. यांच्या एकत्रीकरणामुळे राज्याच्या राजकारणात खूप काही परिणाम होईल असे नाही असे गोरे म्हणाले. जनतेचा विश्वास भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. यांच्या एकत्र येण्याने काहीही फरक पडणार नाही. राज ठाकरेंची भूमिका दिवसाला बदलत जाते भाजप पक्ष फोडणारी टोळी असल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले, ते जर टीका करत असतील तर मग याच व्यवस्थेसोबत (भाजप) ते आजपर्यंत होते. भाजपचे कौतुक करत होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला अधिकचे महत्त्व देण्याची गरज नाही. राज ठाकरेंची भूमिका दिवसाला बदलत जाते, त्यामुळे त्यांच्या विधानाला फार महत्त्व देता येत नाही, अशी टीका गोरे यांनी केली आहे. तसेच सोलापुरात आम्ही महायुती करण्यासाठी इच्छुक आहोत. आज त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली उद्याही चर्चा होणार आहे. मात्र युतीसाठी योग्य तो प्रस्ताव आला तर एकत्रित निवडणूक लढवण्यास आम्ही तयार आहोत, असे जयकुमार गोरे म्हणाले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NDcRbFK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.