राज्यातील शाळांमध्ये राबवण्यात आलेल्या आधार प्रमाणीकरण प्रक्रियेमुळे विद्यार्थी संख्येतील पारदर्शकता समोर आली असून सुमारे ९ लाख दुबार आणि अनधिकृत नोंदी कमी झाल्या आहेत. विधानसभा प्रश्नकाळात शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. आधार पडताळणीमुळे आता खऱ्या पटसंख्येची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली असून या आधारावरच शैक्षणिक सुविधा आणि शिक्षक भरतीचे पुढील नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार, राज्यात प्राथमिक स्तरावर ६,९६३ खाजगी शाळांमध्ये ४९,५४३ शिक्षक पदे मंजूर आहेत. तर माध्यमिक स्तरावर १७,२६३ खासगी शाळांमध्ये १,९२,५८४ शिक्षक पदे आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारावर मंजूर करण्यात आली आहेत. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी “स्कूल मॉनिटरिंग’ प्रणाली अधिक प्रभावी केली जाणार आहे. मराठी शाळांच्या सक्षमीकरणावर भर आमदार विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले की, २०१२-१३ मध्ये नोंदणीकृत विद्यार्थी संख्या २.१८ कोटी होती, ती २०२३-२४ मध्ये २.१२ कोटींवर आली आहे. इंग्रजी माध्यमांकडील ओढा आणि शहरी स्थलांतरामुळे ग्रामीण भागात पटसंख्या घटली असली तरी मराठी शाळा टिकवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष हेल्थ कार्ड आणि सोयी-सुविधा देणार शाळांमध्ये केवळ शिक्षणच नव्हे, तर आरोग्य आणि भौतिक सुविधांनाही प्राधान्य दिले जात आहे. विद्यार्थ्यांचे विशेष हेल्थ कार्ड तयार केले जाणार असून त्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि बूट-पायमोजे वेळेत पुरवले जात आहेत. गुणवत्ता वाढवण्यासाठी पाचवी आणि आठवीऐवजी पुन्हा एकदा चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZGaVTUA
राज्यभरातील शाळांमधील नऊ लाख दुबार नोंदी ठरल्या बाद:"आधार’ पडताळणीतून विद्यार्थी संख्येचे वास्तव आले समोर
February 27, 2026
0