प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने आई आणि मुलीमध्ये सुरू असलेल्या वादाचा शेवट खुनात झाला आहे. “तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम केलं तर दुसरं लग्न करायला काय हरकत आहे?’ मुलीच्या टोकदार प्रश्नामुळे आईचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात आईने बाथरूममध्ये बसलेल्या २१ वर्षांच्या मुलीचा रबराच्या पाइपने गळा आवळून खून केला. ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे घडली आहे. नंदिनी राजू धिवरे (२१) असे मृत तरुणीचे नाव असून, याप्रकरणी आई भारती उमेश साबळे, सावत्र वडील उमेश गोविंद साबळे आणि मामा अमोल गायकवाड यांच्यावर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत नंदिनीचा प्रेमविवाह झाला होता. ती पतीपासून विभक्त होऊन तीन वर्षांपासून आईसोबत राहत होती. दरम्यान, तिचे कन्नड येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. मात्र, आई भारतीचा त्याला विरोध होता. यावरून गेल्या आठ दिवसांपासून घरात सतत भांडणे होत होती. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास घरात कुणी नसताना पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी नंदिनीने आईला म्हटले ‘तू दुसरा नवरा केला, मी करायला काय हरकत?’ हा प्रश्न भारतीच्या जिव्हारी लागला. त्यामुळे तिने रबरी पाइपने नंदिनीचा गळा आवळला. पोस्टमाॅर्टेम अहवालात खुनाचा उलगडा सुरुवातीला पालकांनी नंदिनीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच आईने गुन्हा कबूल केला. रिक्षाचालकाला संशय आला अन्... आईने खुनाची माहिती पती व भावाला दिली. त्यानंतर ती पतीसह रात्री नऊच्या सुमारास रिक्षातून मृतदेह घेऊन निघाले. मात्र, तिसगाव चौफुली परिसरात रिक्षाचालकाला त्यांच्या वागण्याचा आणि गादीतील संशयास्पद वस्तूचा संशय आला. त्याने त्यांना तेथेच उतरवून देत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी गादी उघडून पाहिली असता त्यात तरुणीचा मृतदेह आढळला. इनसाइड स्टोरी- पुरावा नष्ट करण्यासाठी रचला बनाव नंदिनी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना आई भारतीने शेजारील हंड्यातून पाणी पिण्याचा बहाणा केला आणि तिथेच पडलेला रबरी पाइप उचलून तिचा गळा आवळला. या वेळी भारतीचा दुसऱ्या पतीपासून झालेला मोठा मुलगा कंपनीत, तर लहान मुलगा खेळायला बाहेर गेला होता. हत्येनंतर तिने एकटीनेच मृतदेह बाथरूमबाहेर ओढत आणला. तिला स्वतः कपडे घातले. भारतीने पती उमेश आणि भाऊ अमोल गायकवाड यांना फोन करून हत्येची माहिती दिली. दोघेही तातडीने रूमवर आले. कुणाला काही सांगू नका, आपण मृतदेह कन्नडच्या शेतात नेऊन गुपचूप पुरून टाकू, असे ठरवून तिघांनी कट रचला. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी मृतदेह गादीत गुंडाळला. घर बदलत असल्याचे वाटावे म्हणून त्यांनी सोबत पाण्याचा ड्रम व संसारोपयोगी भांडी घेतली. उमेशने रिक्षा आणली, त्यात मृतदेह व सामान भरले. अमोल गावी निघून गेला, तर भारती आणि उमेश मृतदेहासह रिक्षाने प्रवासाला निघाले होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/0kcesht
वाळूजमधील खुनाचा उलगडा:‘तू दुसरा नवरा केला... मी का नको?’ म्हणताच चिडलेल्या आईने पाइपने मुलीचा गळा आवळला
February 20, 2026
0