राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर महत्त्वाची विधाने केली. अजित दादांच्या निधनानंतर पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर तटकरे यांनी “प्रस्ताव आल्यास एकत्रित बसून चर्चा करू’ असे संकेत दिले आहेत. दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या एका लेखातील दाव्यांवर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी एका मासिकात “भावपूर्ण निरोप’ या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे. यात त्यांनी म्हटले की, “अदृश्य शक्तीच्या कारवाया आणि खोट्या आरोपांमुळे दादांना पक्ष सोडावा लागला होता, पण ती चूक दुरुस्त करण्यासाठी दादा गेल्या ४-५ महिन्यांपासून कामाला लागले होते.’ या विधानावर तटकरे यांनी आक्षेप घेतला. धुरा अजितदादांकडे सोपवण्याचा झाला होता निर्णय शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकातील लेखात “दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला होता,’ असे शिंदे यांनी म्हटले आहे. अजितदादा गेल्या ४-५ महिन्यांपासून दोन्ही गट एकत्र करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी शरद पवार, जयंत पाटील आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी यावर चर्चा केली होती. १२ फेब्रुवारीला शरद पवारांच्या उपस्थितीत विलीनीकरणावर शिक्कामोर्तब झाले होते, असा दावा शिंदेंनी केला आहे. दरम्यान, या दाव्यावर आता सुनील तटकरे आपली भूमिका मांडणार असून त्यांनी लेखाची प्रत मागवून घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची युती ही विलीनीकरणाच्या रणनीतीचाच भाग होती. अजितदादा चर्चा करत होते “अजितदादा विलीनीकरणाबाबत चर्चा करत होते, हे सत्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता त्या चर्चेत नव्हता, याचा अर्थ चर्चा झालीच नाही, असा आमचा दावा नाही. मात्र, दादांच्या निधनानंतर आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या प्रक्रियेत आता भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेणे अनिवार्य असून सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा विचारात घ्यावी लागेल.’ - हसन मुश्रीफ, मंत्री पुरावे असतील तर चौकशी अधिकाऱ्यांना द्या: छगन भुजबळांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. “ज्यांना या प्रकरणावर शंका आहे किंवा ज्यांच्याकडे काही पुरावे आहेत, त्यांनी ते खुशाल चौकशी करणाऱ्या यंत्रणांकडे द्यावेत,’ असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशी सुरू केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या पोलिस चौकशीचे आदेश दिले आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/8g7B1mf
राष्ट्रवादी विलीनीकरणावर तटकरे म्हणाले, प्रस्ताव आल्यास चर्चा करू:शशिकांत शिंदे यांच्या लेखातील दाव्यांवर नोंदवला आक्षेप
February 13, 2026
0