Type Here to Get Search Results !

वीज तारांमधून पडलेल्या ठिणग्यांनी शेतात आग:गहू आणि संत्रा बागेचे मोठे नुकसान, शेतकऱ्याची तक्रार; अमरावतीच्या चिंचोनातील घटना

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मौजा चिंचोना येथील गट क्रमांक ३१२ मध्ये विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस तयार असलेले गव्हाचे पीक आणि संत्रा बाग जळून खाक झाली आहे. भंडारज येथील युवा शेतकरी वैभव अशोक ठाकरे (वय २८) यांच्या दोन एकर शेतीत ही घटना घडली. त्यांनी संत्रा बागेत आंतरपीक म्हणून गव्हाचे पीक घेतले होते. आगीमुळे सुमारे एक एकरातील गहू पूर्णपणे जळून खाक झाला, तर सुमारे ३०० संत्रा झाडेही गंभीररीत्या बाधित झाली. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे हा अपघात घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या नुकसानीची भरपाई महावितरणकडून मिळावी, अशी मागणी पुढे आली आहे. घटनेनंतर शेतकरी ठाकरे यांनी भंडारज येथील महावितरण कार्यालयात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाखा अभियंता पवार यांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. वैभव ठाकरे यांनी आमदार गजानन लवटे, उपविभागीय अभियंता तसेच तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/fF6ngYh

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.