Type Here to Get Search Results !

बिर्याणी आणि कलिंगड खाणे बेतले जीवावर:विषबाधेमुळे अख्खे कुटुंब संपले, दोन चिमुरड्यांसह आई-वडिलांचा अंत; मुंबईतील घटना

मुंबईच्या गजबजलेल्या पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या भीषण विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १३ आणि १६ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण दक्षिण मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे. पायधुनीतील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत जेवण केले. मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने जेवणात आधी बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर कलिंगडाचे सेवन केले. मात्र, हाच आहार त्यांच्या जिवावर बेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना मळमळ, उलट्या, चक्कर आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबाने प्रथम फॅमिली डॉक्टरांकडून औषधे घेतली, मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्याने संपूर्ण कुटुंबाला तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. सकाळी १०:१५ वाजता १३ वर्षीय झैनब हिचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांच्या अंतराने आई नसरीन (३५) आणि मोठी मुलगी आयशा (१६) यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री १०:३० वाजता कुटुंबाचे प्रमुख अब्दुल्ला डोकाडिया (४०) यांचीही प्राणज्योत मालवली. पोलिस तपास आणि वैद्यकीय गूढ या घटनेची माहिती मिळताच जे.जे. मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीने दिलेल्या जबाबात बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याचा उल्लेख केला होता. विषबाधा बिर्याणीतून की कलिंगडातून? दरम्यान, पोलिसांनी प्रारंभी विषबाधा झाल्याचे सांगितले असले, तरी चौघांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टरांनी हिस्टो-पॅथॉलॉजी अहवाल प्राप्त होईपर्यंत आपला अंतिम निष्कर्ष राखून ठेवला आहे. विषबाधा बिर्याणीमुळे झाली की कलिंगडावर मारलेल्या औषधांमुळे, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांच्या मते, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. हे ही वाचा… पद्म पुरस्कारांच्या शिफारस समितीमधून सांस्कृतिक मंत्र्यांना वगळले:आशिष शेलार यांना डावलल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. ही समिती पद्म पुरस्कारांसाठी विविध माध्यमातून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासनास करेल. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मात्र, या समितीमधून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना डावलण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्र्यांना प्रक्रियेतून बाहेर ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा…

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Z9IaETQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.