Type Here to Get Search Results !

आरोग्य विभागात 4193 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या:आरोग्य संस्था बळकटीकरण करण्यासाठी रिक्त जागा भरण्यावर दिला भर

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रिया यंदा प्रथमच समुपदेशन पध्दतीने राबविण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांना बदलीचे ठिकाण देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या समाधानासोबतच आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी रिक्तजागा भरण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यभरात झालेल्या ४१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जिल्हास्तरावर पाठविण्यात आले आहे. राज्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बदली प्रक्रिया राबविण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता, पसंतीक्रम, दुर्गम भागातील सेवा, वैद्यकीय व कौटुंबिक परिस्थिती यांचा विचार करून बदली प्रक्रिया पार पाडण्यात आली. या बदल्यांची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनीही योग्य नियोजन केले होते. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला, नाशिक, कोल्हापूर, पुणे, लातूर आणि ठाणे या परिमंडळांसह विविध विशेष आरोग्य संस्थांमध्ये ता. १३ ते २३ मे या कालावधीत विविध संवर्गातील बदली पात्र कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर बदल्या करण्यात आल्या. या बदली प्रक्रियेत कर्मचाऱ्यांची मागणी तसेच रिक्तपदे भरण्यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. सदरबाब लक्षात घेऊनच बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या हरकतीवर तातडीने निर्णय घेऊन त्यावर मार्ग काढण्यात आला. दरम्यान, राज्यातील परिचारिका संवर्गातील १,५७५, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) संवर्गातील ८०८, कनिष्ठ लिपिक संवर्गातील १९७, औषध निर्माण अधिकारी संवर्गातील १६० आणि प्रयोगशाळा सहाय्यक संवर्गातील १४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाद्वारे करण्यात आल्या. मागील अनेक वर्षांपासून अपेक्षित असलेल्या पारदर्शकतेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे कर्मचारी संघटनांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या बदल्यांचे आदेश नुकतेच आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. आता बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणे तसेच नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. आरोग्य विभाग अधिक सक्षम व गतीमान करण्याचे पाऊल- डॉ. विजय कंदेवाड राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे. यावर्षी बदली प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचाही चांगला प्रतिसाद व सहकार्य मिळाले त्यामुळे या बदल्या अधिक नियोजनबद्ध व सर्वांच्या सहयोगामुळे पारदर्शकपणे करता आल्या, अशी भावना आरोग्य सेवा संचालक डॉ.विजय कंदेवाड यांनी व्यक्त केली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/e9bgP86

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.