Type Here to Get Search Results !

छोटा हत्ती विहिरीत कोसळून 8 भाविकांचा मृत्यू:एकाच कुटुंबातील सासू, 2 सुना, 3 नातवंडे असे 6 जण मृत्युमुखी; माळशिरसमधील घटना

म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन करून पंढरपूरकडे छोटा हत्ती वाहनातून परतणाऱ्या भाविकांवर रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास काळाने घाला घातला. पंढरपूर-सातारा महामार्गावरील तांदुळवाडीजवळ चालकाचा ताबा सुटून त्यांचे वाहन रस्त्यालगत पाच फूट अंतरावर असलेल्या विहिरीत कोसळले. यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जणांना ग्रामस्थांनी वाचवले. यापैकी दोघे स्वत: पोहून बाहेर आले, तर पाच जणांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. मृतांत ४ बालकांसह ४ महिलांचा समावेश आहे. संदीप बावचेंच्या कुटुंबातील पत्नी, २ मुले, आई, भाऊ व पुतण्या असे ६ जण मृत्युमुखी पडले. पंढरपूरनजीकच्या इसबावी येथील सिद्धेश्वर पोपट जाधव हे मावशी व बहिणीच्या कुटुंबातील १५ जणांसह रविवारी छोटा हत्ती वाहनाने (एमएच १३ डीक्यू ६३३५) म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतत असताना रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अपघात घडला. ग्रामस्थांनी धाव घेत ट्रॅक्टरला दोर बांधून वाहन बाहेर काढले. दरम्यान, ७ जणांना वाचवले. चालक सागर चौगुले (रा. रांझणी) जखमी झाला. मृतदेह पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले, तर ५ जखमींना तांदुळवाडी येथीलच खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृतांच्या वारसांना पंतप्रधान कार्यालयाने प्रत्येकी २ लाख, तर राज्य सरकारने ५ लाखांची मदत जाहीर केली. दुचाकीवरून उतरून विहिरीत उडी घेऊन चिमुकल्याला वाचवले छोटा हत्तीच्या पाठीमागून मी आणि रणदिवे दुचाकीवर येत होतो. वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने ते विहिरीत कोसळले. वडिलांना फोनवर माहिती दिली. लोकांना घेऊन या असे सांगितले. त्या वेळी दुचाकी रस्त्याकडेला लावून विहिरीत उडी मारली. चार वर्षांच्या मुलाला बाहेर काढले. त्याच्या छातीवर दाबून पोटातील पाणी काढले. तो वाचला. त्याच वेळी विलास पाटील, हणमंत रणदिवे त्यांनीही मदत करत इतर ५ जणांना बाहेर काढले. तोपर्यंत ग्रामस्थ आले. त्यांनीही मोठी मदत केली. दोन जेसीबी, एक क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन व मृतदेह बाहेर काढले. का घडला ? संरक्षक भिंत, कठडा नसल्याने वाहन थेट विहिरीतच ही विहीर तांदुळवाडी येथील रामकृष्ण कदम यांची आहे. रस्त्यापासून फक्त पाच फुटांवर ही विहीर आहे. बाजूला झुडपे आहेत. त्यामुळे विहिरीचा अंदाज येत नाही. त्यातच हे वाहन कोसळले. अनेकदा निवेदने देऊनही संरक्षक कठडा अथवा भिंत बांधली नसल्याचे विहिरीचे मालक रामकृष्ण कदम यांनी सांगितले. अपघात कसा घडला ? ताबा सुटून वाहन ५ फुटांवरील विहिरीमध्ये पंढरपूर-सातारा मार्गाने हे वाहन पंढरपूरच्या दिशेने येत होते. तांदुळवाडीजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास या ठिकाणी असलेल्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. येथेच रस्त्यापासून अवघ्या ५ फुटांवर ही विहीर आहे. या विहिरीत हे वाहन कोसळून अपघात घडला. दिंडोरीत ३ एप्रिलला कार विहिरीत कोसळून ९ जणांचा जीव गेल्यानंतर बुजवली विहीर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे ३ एप्रिलला असाच अपघात झाला होता. मध्यरात्री चालकाचा ताबा सुटून कार ७० फूट खोल व सुमारे ३० फूट पाणी असलेल्या विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांत सहा चिमुरड्यांचा समावेश होता. ९ जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. १२ तासांतच ही जीवघेणी विहीर बुजवली गेली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/OYI50xA

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.