विधान परिषदेच्या १७ पैकी ६ जागा बिनविरोध करण्यात महायुतीला यश आले. मात्र, नाशिक आणि जळगाव येथे महायुतीतील तीन पक्षांमध्ये कुरघोड्या सुरूच असल्याचे दिसते. ४ जून ही अर्ज परत घेण्याची मुदत होती. त्या मुदतीत ज्या बंडखोरांनी माघार घेतली नाही. त्यांनी मतदानापूर्वी म्हणजे १८ जूनच्या आधी किमान अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा, असा प्रयत्न महायुतीचे दुसऱ्या फळीतील नेते करत आहेत. मात्र, नाशिकमध्ये भाजप तर जळगावात शिंदेसेनेचे बंड थंड होत नसल्याचे दिसून आले. यवतमाळचे साहेबराव कांबळे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीचे शैलेश अग्रवाल यांना माघार घेतल्याबद्दल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. तर अर्ज माघारीवरून माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी स्वत:च्याच पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर ‘केसाने गळा कापला’ असा आरोप केला. शिंदेसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे म्हणाल्या, मी लढणारच जळगावमध्ये रेश्मा काळे यांनी भाजपचे नंदकुमार महाजन यांच्याविरुद्ध “हरेन किंवा जिंकेन पण लढणारच,” असा पवित्रा घेतला. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार किशोर पाटील म्हणाले की, काळेंचा निर्णय नाशिकवर अवलंबून आहे. नाशिकमध्ये भाजपच्या गोकुळ गितेंनी शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंविरोधात माघार घेतलेली नाही. दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे आणि प्रदेश उपाध्यक्ष गोरख बोडके यांनी अर्ज मागे घेतले आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/zitZo42
विधान परिषद निवडणूक:नाशिकमध्ये भाजप तर जळगावात शिंदेसेनेचे बंड थंड होईना, माघार घेणाऱ्या दोघांची काँग्रेसकडून हकालपट्टी
June 05, 2026
0