महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील पावसावर होत असून, विविध भागांत पावसाचे प्रमाण वेगवेगळे राहण्याची शक्यता आहे. आज, 16 ऑगस्ट रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला यलो अलर्ट कोकणात रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मात्र पुढील काही दिवस कोकणातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सॅटेलाइट नकाशात पाहा मान्सूनच्या ढगांची स्थिती उत्तर महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट नसून, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या भागात अद्याप पावसाची तूट जाणवत असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे-सातारा घाटमाथ्यावर जोरदार सरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर यलो अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहू शकते. घाटमाथ्यावर होणाऱ्या पावसामुळे या परिसरातील शेतीला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस होत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट विदर्भात बुलढाणा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांत मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता एकूणच, 16 ऑगस्ट रोजी राज्यातील कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भाग वगळता अनेक जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी कमी होण्याचा अंदाज असल्याने सर्वदूर दमदार पाऊस कधी परतणार, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. यूपीच्या लखनऊत रस्त्यांवर 2 फूट पाणी:चित्रकूटमध्ये घरे बुडाली; ओडिशातील 6 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उत्तरप्रदेशात मान्सूनने पुन्हा एकदा वेग पकडला आहे. लखनऊमध्ये तीन तास झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. अनेक भागांतील गल्ल्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. तिकडे, गंगा, यमुना आणि शारदा यासह 11 नद्या दुथडी भरून वाहत आहेत. चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीची पाणी पातळीही वाढू लागली आहे. पाणी वस्त्या आणि घरांपर्यंत पोहोचले आहे. सविस्तर वाचा
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/UjkGthX
महाराष्ट्रात मान्सूनचा लपंडाव:कोकण-घाटमाथा आणि विदर्भात जोरदार सरी, पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज काय?
August 15, 2026
0