जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात बल्लारपूर - गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली असून आतापर्यंत जानेवारी महिन्यात १९ दिवसांत ३ वाघाचा मृत्यू झाला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर झोनअंतर्गत गोंदिया-नागभीड- चांदाफोर्ट - बल्लारशाह हा रेल्वेमार्ग जास्तीत जास्त जंगलव्यात भागातून आहे. त्यातही नागभीड- चांदाफोर्ट रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून असून ताडोबा - अंधेरी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प व घोडाझरी अभयारण्य लागूनच आहे. या रेल्वेमार्गांवर अनेक ठिकाणी वाघ, हरीण, रानगवे, अस्वल यासारखे वन्यप्राणी अपघातात मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असूनसुद्धा आजपर्यंत वन विभागाने यावर ठोस उपाययोजना केली नाही. सिंदेवाही - आलेवाही रेल्वेस्थानकादरम्यान रविवारी बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने या वाघाला धडक दिली. मृत वाघ अंदाजे एक वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घनदाट जंगलातून जाणाऱ्या या रेल्वेमार्गावर वन्यजीव मृत्यूच्या घटना वारंवार होत असून त्या टाळण्यासाठी रेल्वे आणि वन विभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. आतापर्यंत ३ वाघांचा मृत्यू २ जानेवारीला मौजा लाडबोरी येथील शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेहआढळला होता, वाघ वयोवृद्ध असल्याने त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने नोंदवला होता. ९ जानेवारीला मूल तालुक्यातील भांदुरणा या गावी ५ महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Az9dNCY
चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू:एका महिन्यात तब्बल 3 वाघांनी गमावला जीव
January 19, 2025
0