मुंबई ते नागपूरपर्यंतच्या सर्व महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धवसेना आता स्वबळावर लढवणार आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी ही अधिकृत घोषणा केली. “आघाडीत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. म्हणून आम्हाला आमचे स्वबळ आजमावून पाहायचे आहे,’ अशी मखलाशी त्यांनी केली. त्याला खासदार अरविंद सावंत यांनीही पाठिंबा दिला. उद्धवसेनेच्या या भूमिकेचे काँग्रेस नेते, सुप्रिया सुळेंनी स्वागत केले. सुळेंच्याच पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुती म्हणूनच लढणार असल्याचे जाहीर केले. शिंदेसेना महायुतीतच लढणार : एकनाथ शिंदे मुंबई मनपासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुतीतच लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मनसेशी मुंबईत युतीचा निर्णय मुंबईतील भाजपचे नेते, पदाधिकारी घेतील. सुप्रियांचे एक, आव्हाडांचे दुसरेच खा. सुप्रिया सुळे : महापालिकेची निवडणूक कायकर्त्यांची असते. त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलाव्यात का? त्यामुळे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आ. जितेंद्र आव्हाड : उद्धवसेनेने हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय. मात्र, त्यांच्या स्वबळाच्या इच्छेला थांबवणारे आम्ही कोण? पण हा निर्णय योग्य नाही. ४ निवडणुका उद्धवसेनेने मविआच्या मदतीने लढल्या उद्धवसेना काँग्रेस, शरद पवारांच्या मदतीने विधानसभा पोटनिवडणूक, २०२४ ची लोकसभा, विधानसभा, ग्रा. पं. लढली. पुढे काय? : निकालानंतर एकत्र येऊ शकते मविआ उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा जाहीरपणे दिल्याने यापुढील काळात महाविकास आघाडीची सध्या तीन शकले होणे आता अटळ झाले आहे. मात्र, मनपा, जि.प.तील स्थानिक राजकारण, संख्याबळ पाहून तेथील निकालानंतर महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हे तिन्ही पक्ष मविआचा प्रयोग करू शकतात. विधानसभेनंतर काय झाले? मविआविरुद्ध आवाज वाढला आतापर्यंत मातोश्रीवरील आढावा बैठकांना एका जिल्ह्यातून किमान ३०० पदाधिकारी असायचे. डिसेंबरअखेरच्या आढावा बैठकांना काही जिल्ह्यांतील फक्त २५ जण हजर होते. काँग्रेस, शरद पवारांसोबत जाणे म्हणजे आत्मघातच, असे त्यातील बहुतांश जणांनी उद्धव यांना बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. वडेट्टीवार, गायकवाडांकडून स्वागत विजय वडेट्टीवार : त्यांच्या पक्षाचे मोठे नेते असलेल्या संजय राऊत यांनी घोषणा केली आहे. तरीही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे. खा. वर्षा गायकवाड : आमच्याही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांना लढायची संधी मिळाली पाहिजे. आमच्या नेत्यांशी चर्चा करून याविषयी निर्णय घेऊ. का घेतला निर्णय : मुंबई मनपा हातून जाण्याची धास्ती विधानसभेत हिंदुत्ववादी मतदार उद्धवसेनेपासून दुरावले. यामुळे अनेक पदाधिकारी महायुतीकडे जात आहेत. आता उद्धवसेनेसाठी सर्वात महत्त्वाची मुंबई मनपा हातातून जाण्याची धास्ती आहे. आऊटगोइंग रोखून, हिंदुत्ववादी मते मिळवण्याचा स्वबळाशिवाय दुसरा मार्गच उद्धव ठाकरेंकडे शिल्लक नाही. विधानसभा निवडणुकीत जबर फटक्याचा परिणाम एकेकाळी शिवसेना सोडणाऱ्यांना दंडुक्यांचा कपडे फाटेपर्यंत जाहीर प्रसाद दिला जात असे. विधानसभेच्या निकालानंतर आऊटगोइंग वाढत चालल्याने शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी ‘ज्यांना जायचे त्यांनी जा’ असेही म्हटले होते. प्रत्यक्षात वेगळेच घडत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरातील एका मेळाव्यात उद्धव ठाकरेंना सोडू नका, अशी विनवणी करत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जाहीरपणे दंडवत घातला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZO7JkoX
वाघ आता एकटाच चालणार,:मनपा, जि.प. निवडणुका स्वतंत्र लढण्याची उद्धवसेनेची घोषणा; शरद पवार गट, काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’
January 11, 2025
0