Type Here to Get Search Results !

मंडे पॉझिटिव्ह:बंदूक खाली ठेवून गडचिरोलीच्या पोलिसांसमोर शरण आलेले 293 नक्षलवादी कौशल्य प्रशिक्षण घेऊन रमले खासगी नोकरी, व्यवसायात

बुलेटपासून बॅलेटपर्यंत नक्षल्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. एकेकाळी फक्त गोळ्या झाडून इतरांचे जीव घेणेच ज्यांना माहिती होते ते अाता सन्मार्गाला लागले आहेत. केवळ माओवादी विचारसरणीसाठी निष्पापांना मारणारे सुमारे २९३ नक्षली पश्चात्तापाच्या बुद्धीने शरण आल्यानंतर आता विविध व्यवसाय करून संविधानावर विश्वास दृढ करीत सन्मानाने जीवन जगत असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी “दिव्य मराठी’ला दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांना विविध रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावले आहे. त्यांच्यासाठी “नवजीवन’ वसाहत स्थापन केली आहे. या शिवाय कोनसरी येथील लाॅइड मेटल्समध्ये कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे १००० कोटींचे शेअर्स मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली भागातून आतापर्यंत ६९५ नक्षली शरण आले असून ३३६ नक्षली चकमकीत ठार झाले आहे. पोलिसांच्या आक्रमक धोरणामुळे सध्या दक्षिण गडचिरोलीत फक्त ४६ नक्षली उरलेले आहे. आत्मसमर्पित नक्षल्यांना सरकार विविध सोयी-सुविधा देते. त्यांना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण देते. सध्या १०० नक्षली गावी जाऊन शेती करीत आहेत. ते घेऊन आज ५ जण बांधकाम ठेकेदार, २० बांधकाम मिस्त्री म्हणून काम करीत होते. ६० जण मजुरी, १० जणांनी किराणा दुकान थाटले आहे. चिकन सेंटर, फिनाइल विक्री, शिवणकाम, ड्रायव्हर, एसपीओ, होमगार्ड म्हणूनही काही जण उदरनिर्वाह करत आहेत. एक शरणार्थी तर चक्क कंत्राटी नगर परिषद कर्मचारीही आहे. कोनसरी येथील लाॅइड मेटल्सच्या स्टील कारखान्यात ४७ जण काम करीत आहेत, तर कौशल्य विकास केंद्रात ४७ जण प्रशिक्षण घेत आहेत, असे नीलोत्पल यांनी सांगितले. अतिदुर्गम भागात पोलिस मदत केंद्र: नक्षल्यांचा प्रभाव असलेल्या अतिदुर्गम भागात पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात येत आहे. तिथेही विकासकामे केली जात आहेत. रस्ते, पाणी, वीज, बोअरवेल आदी सुविधा देण्यात येत आहे. आतापर्यंत मन्नेराजाराम, पिपली बुर्गी, वांगेतुरी, गर्देवाडा, पेनगुंडा, नेलगुंडा येथे मॅकवेल पद्धतीने पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. नक्षलवाद विरोधी अभियान व गडचिरोली पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे नक्षल दलम संपत आहे. पूर्वी १५ दलम होते. सध्या दक्षिण गडचिरोलीत ४ दलम आहे, तर ११ दलम पूर्णपणे संपलेले आहे. केंद्रीय समिती सदस्य ते कमांडरपर्यंत ४१ नक्षली मारले गेले आहेत. नक्षल्यांच्या नाकावर टिच्चून एका दिवसात उभारली पोलिस चौकी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, आजवर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या नेलगुंडा येथे त्यांच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी एका दिवसात पोलिस चौकी उभारली आहे. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात अनेक गावांवर नक्षलवाद्यांची बिनधास्त हुकूमत चालत होती. नेलगुंडाच्या दक्षिण टोकावर भामरागड तालुक्यात अति दुर्गम व घनदाट जंगलात वसलेले गाव आहे. या भागात आजवर शासनाच्या इतर कुठल्याही विभागाचा वावर नव्हता. पोलिस आणि सुरक्षा दलही त्या परिसरात जात नव्हते. माओवाद्याची मुलगी इंजिनिअरिंगला आत्मसमर्पित माओवादी सदस्य किरण ऊर्फ समय्या ऊर्फ राजाबाबू राजाराम बारसागडे याची मुलगी अरविंदा राजाबाबू बारसागडे ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालय, इंदाळा, गडचिरोली येथे ती तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिला १ जानेवारी रोजी टॅब देण्यात आला. भामरागड दलमची सदस्य सुमन ऊर्फ सगुना बिसराम मडावी हिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आत्मसमर्पित नक्षल्यांचे सामूहिक विवाह लावून दिले जातात. आतापर्यंत एकूण ३ सामूहिक विवाह सोहळ्यातून ४५ आत्मसमर्पित माओवाद्यांचे विवाह झाले आहेत, अशी माहिती निलोत्पल यांनी दिली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/R2J31jM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.