Type Here to Get Search Results !

व्हॅलेंटाइन डे स्पेशल:नाटकामुळे प्रेमात पडले अन् क्रांतीच्या विचारांनी एकत्र आणले, वाचा एका प्रेमाची दुसरी गोष्ट!

'प्रेमा तुझा रंग कसा, पावसाच्या बरसणाऱ्या सरींसारखा कधी लख्ख उजेड तर कधी गडद काळोख' पहिल्या उत्कट, आंधळ्या ओढीचा गुलाबी रंग, नंतरच्या रुसण्या रागावण्याचा लाल रंग, पुढच्या कडू भांडणाचा काळा रंग – सारे प्रेमाचेच रंग! अनुराग, राग, विरह, कलह या साऱ्या प्रेमाच्याच अटळ अवस्था! प्रेम ही मोठी उदात्त भावना खरीच. शेकडो वर्षांपूर्वी संत कबीर म्हणून गेलेत... “ढाई अक्षर प्रेम के, पढ़े सो पंडित होय” म्हणजेच ज्याला प्रेमाची अडीच अक्षर समजलीत त्यालाच सगळ पांडित्य आलं. नाटकच ज्यांच्या संसाराचा दुवा ठरला असे सुजाता आणि पद्मनाभ पाठक. आंदोलन, मोर्चे, दौऱ्यातून ज्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली असे अ‍ॅड. अभय टाकसाळ आणि मानसी बाहेती. या दोघांच्या प्रेमविवाहाच्या सफल कथा 'दिव्य मराठी डिजिटल'ने जाणून घेतल्या. या दोन्ही लव्ह स्टोरीजला सांधणार दुवा म्हणजे निर्मळ प्रेम. 4 दिवसातही लग्न तुटणाऱ्या काळामध्ये वर्षानुवर्षे एकमेकांना साथ देत संसाराची नौका पार करणारे हे दोघे जोडपे ग्रेट तर आहेतच. तितक्याच त्यांच्या लव्ह स्टोरीजही काळजाला भिडणाऱ्या आहेत. आत्ताच्या काळात सहज नाते तोडणाऱ्या तरुणाईला एक वेगळा संदेश यांच्या गोष्टीतून मिळतो. नाटकातूनच झाली प्रेमाची सुरुवात पद्मनाभ आणि सुजाता पाठक यांची प्रेम कथा तशी साधीच, पण मनाचा ठाव घेणारी. घरून लग्नाला विरोध नाही, पळून जाऊन लग्न नाही. पण हळुहळू फुलणारी त्यांची ही कथा एखाद्या नाटाकाची स्क्रिप्टच वाटते. कडू, गोड, तिखट, आंबट, तुरट अशा सगळ्या चवींनी युक्त अशी त्यांच्या प्रेमाची आणि संसाराची गोष्ट आहे. सुजाता पाठक दोघांच्या पहिल्या भेटीविषयी सांगतात. त्या म्हणतात, तीन पैशांचा तमाशा या नाटकात आम्ही दोघं सोबत काम करत होतो. नाटकाच्या तालमीनंतर मला घरी सोडायची जबाबदारी याच्यावर होती. त्यावेळी त्याने मला प्रपोज केले. पण मी फार घाबरले. लगेच उत्तर देऊ शकले नाही. नंतर काही दिवसांनी लक्षात आले की मी देखील हळूहळू याच्या स्वभावाच्या, अभिनयाच्या प्रेमात पडले. आत्ता जिथे गजानन मंदिर आहे त्या चौकातच त्यावेळी मी गाडीवर त्याला माझं होकारार्थी उत्तर दिलं. आणि त्याही वेळी मला याची खात्री होती की हा आयुष्यभर मला अभिनय करू देणार. आणि इथूनच सुरू झाला आमच्या प्रेमाचा प्रवास. ज्याला 28 वर्षांहून अधिक वर्षे लोटलीत. नाटक हे आम्हा दोघांच दुसर मुलच पुढे त्या सांगतात, आमच्या दोघांच्याही घरी आमच्या प्रेमाला विरोध नव्हता. आमची जात वेगवेगळी असती तरीही समाजवादी विचारसरणीमुळे माझ्या घरातल्यांना हे लग्न मान्यच होतं. तर दुसरीकडे माझ्या येण्याने पद्मनाभच्या जीवनाला शिस्त येईल असे त्याच्या घरातल्यांना वाटत होते. पण प्रत्यक्षात मात्र झाले वेगळेच. आधी तो एकटाच नाटकाच्या तालमीवरून यायचा लग्नानंतर दोघेही सोबत घरी परतू लागलो. एवढा बदल झाला. सुरुवातीपासून आमच्या संसाराचा दुवा आणि बेस जो म्हणता येईल तो नाटकच राहिला. नाटक हे आम्हा दोघांच दुसर मुलच आहे. माझ्यातल्या अभिनेत्रीला घडवलं सुजाता पाठक पुढे म्हणतात, त्या काळी नाट्य क्षेत्रात काम करणं महिलांसाठी इतकही सोप्प नव्हतच. माझं नाटकाच करिअर जे पुढे जाऊ शकलं, मी मनाजोगत काम करु शकले ते फक्त आमच्या नात्यामुळे. कारण पद्मनाभने मला कायमच नाटकासाठी प्रोत्साहन दिलं. माझी अभिनयाची भूक, कलेप्रती असलेली आवड त्याने समजून घेतली. माझ्यातल्या अभिनेत्रीला घडवण्याचं, आकार देण्याचं काम त्याने केलं. लग्नानंतरही जितक्या स्वतंत्रपणे मी करिअर करू शकले ते केवळ त्याच्या पाठिंब्यामुळेच. अभिनयात आपल्याला 11 सुवर्ण पदके मिळाल्याचेही त्या अभिमानाने सांगतात. दोघांचही वेड नाटकच पद्मनाभ पाठक यावेळी बोलताना म्हणाले, संसार म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणारच. मग तो प्रेमविवाह असला तरी वाद हे होणारच. सगळंच गोड-गुलाबी अस नसतं. आमचेही सुरुवातीला वाद व्हायचे, अजूनही होतात. पण त्यातून चांगल निष्पन्न होतं. आता तर आम्ही इतके एकजीव झाले आहोत की सुजातामध्ये मला एक आई, बहीण, मैत्रीण, बायको या सगळ्याच भूमिका दिसतात. आमच्या संसारात आर्थिक गोष्टींना दुय्यम महत्त्व होतं. कारण दोघांचही वेड हे नाटक होतं. सुरुवातीची काळ संघर्षाचा आणि आर्थिक अस्थिरतेचा होता. पण आमचं कधी त्यावाचून अडलं नाही. थोडीशी पडती बाजू घ्यावी आत्ताच्या तरुणाईच्या नात्यांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबद्दल पद्मनाभ पाठक म्हणतात,पूर्वी पुरुषांचा इगो खूप असायचा. तो स्त्रियांनाच सांभाळावा लागायचा. पण आत्ताच्या जनरेशनमध्ये असे नाही राहिलेले नाही. आता स्त्रीला पण तेवढाच निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झालाय. यामुळे आज ॲडजेस्टमेंट हा प्रकार कमी झालाय. फार लवकर संसार तुटत आहेत किंवा घटस्फोटाच्या प्रकरणांपर्यंत जात आहेत. हा सगळा जो प्रॉब्लेम आहे हा आयक्यू आणि इक्यू मध्ये असलेला जो इक्वलिब्रियम पॉईंट आहे तो बिघडल्यामुळे होत असेल. थोडसं आजच्या जनरेशनने इगो आणि हे सगळं सांभाळावं आपली निर्णय क्षमता ही आपल्याजवळ राखून ठेवावी आणि स्वतःचा अस्तित्वही ठेवावं पण तरीही थोडसं लग्न म्हटलं की ॲडजस्टमेंट असतेच. आपण थोडीशी पडती बाजू घ्यायची असते. हा मंत्र लक्षात ठेवला तर फारसे काही प्रॉब्लेम येणार नाही. सुजाता पाठक म्हणाल्या, आजची पिढी प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल नक्कीच असावं पण इमोशनल पण असावं. प्रेम करावं आणि प्रेम जपावंही. विचारधारेने एकत्र आले अन् प्रेमात पडले आंदोलन, मोर्चे, सभांमधून ज्यांच्या प्रेमाचा अंकुर फुटला असे अभय टाकसाळ आणि मानसी बाहेती. अभय आणि मानसी यांचा प्रेमविवाह हा त्यांच्यानंतरच्या कित्येक जोडप्यांसाठी आदर्श ठरला. टाकसाळ आणि बाहेती दोन्ही कुटुंबांचे मैत्रीपूर्ण संबंध हे आधीपासूनच. मात्र पुढे जाऊन आपण एकमेकांची जोडीदार म्हणून निवड करू असे दोघांनाही कधी वाटले नव्हते. मात्र एका विचारधारेने दोघांना कायमच संसारबंधनात बांधलं. आपल्या प्रेमाविषयी सांगताना मानसी बाहेती म्हणतात, देशातली सगळ्यात जुनी विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनमध्ये आम्ही सोबत काम करायचो. क्रांतीने भारावलेला तो काळ होता. या संघटनेचा जो विचार होता तो विचार पटल्यामुळे आम्ही एकत्र आलो आणि त्या संघटनेमध्ये काम करत असताना सातत्याने खूप आंदोलन उभारले. उपक्रम केले, विविध प्रकारच्या चळवळी केल्या. या प्रवासात आम्ही दोघं या विचारधारेने सोबत काम करताना असं वाटलं की आपण आयुष्यभराचे पण सोबती होऊ शकतो. त्यामुळे या विचारानेच आम्हाला एकत्र आणलं. सुखी आणि आनंदी आयुष्य अभय टाकसाळ म्हणतात, कधी विचार केला नव्हता की आम्ही दोघं अगदी सहजीवनातले जोडीदार होऊ. त्यावेळेस अगदी संघटनेच्या कामांमध्ये संपूर्ण वेळ जायचा. परंतु आमच्या संघटनेमध्ये मुलं मुली फार विश्वासाने आलेली असायची. आणि संघटनेमध्ये एक लोकशाही परंपरा होती. त्यामध्ये बैठकीमध्ये निर्णय घ्यायचा आणि एकमेकांचे विचार ऐकून घ्यायचे. एकमेकाचा आदर करायचा. असे वातावरण होते. ज्या वेळेस मी वकील झालो आणि तिचं देखील शिक्षण सुरू झालं. घरच्यांनी पाठपुरावा सुरू केला. लग्नाचे काय तेव्हा आम्ही एकमेकाचा विचार केला. आज सुखी आणि आनंदी आयुष्य चाललंय. मानसी बाहेती आणि अभय टाकसाळ या दोघांच्या आई-वडिलांचाही प्रेमविवाहच. त्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोधाचा प्रश्नच नव्हता. जो विचार आम्ही सोबत जगलो तोच आम्ही कायम कृतीत उतरवला असं मानसी या अभिमानाने सांगतात. पुढे त्या म्हणतात, अभय आमच्या सगळ्यांसाठी लीडर, हिरोच्या रुपात होता. कायम सगळ्यांना सोबत घेऊन चालणार. जेव्हा दिल्लीला इतर शहरांमध्ये दौऱ्यांवर जायचो. त्यावेळी अभयसोबत असल्यामुळे कम्फर्ट वाटायचं. तो सगळ्यांची ज्याप्रकारे काळजी घ्यायचा, स्वतः संपूर्ण प्रवासात उभाच असायचा. ते पाहून त्यावेळी त्याच्याविषयी आदर वाटायचा. तो आजही तसाच कायम आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/b674fTE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.