Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा:‘चितपट’वरून आदळआपट, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केला सौम्य लाठीमार

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील १२५ किलो वजन गट गादी विभागात अंतिम लढतीत पंचांनी शिवराज राक्षेला चितपट घोषित करत पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. त्याच्या समर्थकांनी थेट मैदानात धाव घेत पृथ्वीराजला उचलून घेतले. चिडलेल्या शिवराज समर्थकांनी वादग्रस्त निर्णय देणाऱ्या पंचांना जाब विचारला. शिवराजने पंचांची गचांडी पकडून ‘आमचा आक्षेप असूनही निर्णय कसा काय दिला?’ असे म्हणत पंचांना लाथ मारली. मात्र पोलिसांनी त्याच्यासह समर्थकांना मागे खेचत बाजूला नेले. शिवराज राक्षे व त्याच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार मुरलीधर मोहोळ बसलेल्या व्यासपीठावर धाव घेतली. त्यांच्याकडेही तक्रार करत आक्षेप नाेंदवला. तोवर माइकवरून शिवराज राक्षे व त्याच्या समर्थकांना बाहेर काढा, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या. त्यानुसार पोलिसांनी शिवराजला बाहेर जाण्याची विनंती केली. दरम्यान, शिवराज राक्षे याने प्रसारमाध्यमांना सामोरे जात आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. दोन्ही खांदे टेकल्यानंतरच चितपट म्हटले जाते. आपले खांदे टेकलेले नव्हते तरीही पंचांनी चितपट झाल्याचे जाहीर केले व प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषित केले. या निर्णयावर आम्ही आक्षेप घेतला. रेफरींना सामन्याचा रिव्ह्यू करून निर्णय देण्याची विनंती केली, पण पंचांनी ती धुडकावून लावली. जाणूनबुजून चुकीचा निर्णय दिल्यामुळे अन्याय झाल्याचा पुनरुच्चार त्याने केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवराजला मैदानाबाहेर जाण्याची विनंती केली. पोलिस अधीक्षक राकेश ओला घटनास्थळी आले. त्यांनीही शिवराज राक्षेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला व समर्थकांना सुरक्षितपणे बाहेर नेले. निर्णय चुकला, पण खेळाडू वृत्ती ठेवा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शिवराज पराभूत झाल्यानंतर त्याने पंचांना शिविगाळ करण्याचा प्रयत्न केला, तसेच मारहाणदेखील केली. रिप्लेमध्ये पंचांचा निर्णय चुकल्याचे दिसून येते. मात्र खेळामध्ये कधी कधी पंचांचा निर्णय चुकतो. खेळात पंचांना देवाचे स्थान आहे. इतर खेळाप्रमाणे खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने निर्णय मान्य करायला हवा होता, असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले. मुलगा खोटे बाेलत नाही, रिव्ह्यू का नाही घेतला? आमच्या शिवराजची मेहनत चुकीच्या निर्णयामुळे वाया गेली. तो तिसऱ्यांदा नक्की महाराष्ट्र केसरी बनला असता. मी देवापुढे बसून होते तो जिंकवा म्हणून. पण त्याच्यावर अन्याय केला. तो कधीच खोटे बोलत नाही. आयोजकांनी रिव्ह्यू का पाहिला नाही? गेल्या वेळी सिकंदर शेखच्या लढतीदरम्यान असाच शिवराजवर अन्याय केला होता. - शिवराज राक्षेचे आई-वडील महेंद्र गायकवाडसह समर्थकांचा धिंगाणा, तणावात बक्षीस वितरण अंतिम लढतीत महेंद्र गायकवाड याने मैदान सोडल्यावर पंचांविरोधात रोष व्यक्त केला. पंचांच्या लॉबीत गायकवाडसह त्याच्या समर्थकांनी उड्या घेतल्याने मोठी धावपळ उडाली. त्यामुळे खुर्च्याही फेकल्या गेल्या. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत त्यांना पांगवले व गायकवाड याला मैदानातून बाहेर काढले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणत बक्षीस वितरण सोहळा पार पडला. आम्हाला निर्णय अमान्य दोन्ही मुले आमचीच आहेत. पंचांनी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो. त्याचे वर्ष वाया गेलेच ना? वर्षभर तयारी केलेली असते, त्या रागातून असे घडू शकते. शिवराज राक्षेबद्दलचा पंचांचा निर्णय आम्हाला अमान्य आहे. त्याचे खांदे टेकले नव्हते हे व्हिडिओत स्पष्ट दिसते. - काका पवार, कुस्ती प्रशिक्षक माझ्यावर केलेली कारवाई चुकीची आहे मी पंचांना व्हिडिओ रिव्ह्यू दाखवा, ही मागणी केली होती. तो दाखवला नाही. मला व जनतेलाही तो दाखवावा, माझी पाठ टेकली असेल तर मी हार मानायला तयार आहे. मात्र, आधी व्हिडिओ रिव्ह्यू दाखवा आणि मला न्याय द्या. माझ्यावर संघटनेने केलेली कारवाई चुकीची आहे. - शिवराज राक्षे, कुस्तीपटू शिवराजचा आरोप ‘उपांत्य सामन्यात माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते, कुस्तीही चितपट झाली नाही तरीही पंचांनी मला पराभूत घोषित केले. चुकीचा निर्णय दिला. मी मागणी केल्यानंतरही त्यांनी रिव्ह्यू पाहिला नाही.’

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/UJQGBfI

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.