आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन एक महत्त्वाचे अभियान राबवत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी मारेगाव तालुक्यात बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत मुक्काम केला. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतील सोई-सुविधांची पाहणी केली. आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करु, असे ते यावेळी बोलतांना म्हणाले. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रकल्प अधिकारी अमीत रंजन, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार उत्तम नीलावाड, बोटोणीच्या सरपंच सुनिता जुमनाके, उपसरपंच प्रविण वनकर व आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आश्रमशाळेत आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना त्यांनी आश्रमशाळा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण बनविण्यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा आश्रमशाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. भोजन, निवास व सोई-सुविधा पाहणी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मंत्री डॉ. उईके यांनी रात्री वसतिगृहातील स्वयंपाकघर, धान्यसाठा गृह, विद्यार्थी व विद्यार्थीनींची निवास व्यवस्थेची पाहणी केली. आश्रमशाळेत तयार झालेले भोजनाचा विद्यार्थ्यांसह पंगतीत बसून त्यांनी आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी यावेळी गोंधळ, कोलामी नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या सादरीकरणाचे मंत्री डॉ. उईके यांनी कौतुक केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/jMAsyJ1
आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करु:आमदार डॉ. अशोक उईके यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
February 08, 2025
0