शहरातील संमदनगर वसाहतीत रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास १५ ते २० गोरक्षक आणि तीन पोलिसांवर २०० जणांच्या जमावाने हत्यारांसह दगड- विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात २ गोरक्षक गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले. यातील दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून अपर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक तळ ठोकून होते. हिंदुत्ववादी संघटनांनी विंचूर चौफुलीवर ठिय्या मारत आरोपींना २४ तासांत अटकेची मागणी करत तहसीलदार आबा महाजन व उपअधीक्षक बाजीराव महाजन यांना निवेदन दिले. येवला-नांदगाव मार्गावर संमदनगर वसाहतीतील बर्फ कारखान्याजवळ चार ते पाच घरांत गाेवंशाची अवैध कत्तल केली जाते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली. याची माहिती गोरक्षकांनी पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांना शनिवारी सायंकाळी दिली. रविवारी सकाळी कारवाईसाठी सोबत पोलिस द्या, अशी विनंती केली. रविवारी सकाळी साडेसातला वसाहतीत १५ ते २० गोरक्षकांसह तीन पोलिस गेले. तेथे कत्तलीसाठीच्या खोल्यांची पाहणी करत असताना एका खोलीतून एक जण पिशवीत काहीतरी घेऊन दुचाकीवरून पळाला. दोन पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग केला. गोरक्षक इतर खोल्यांची तपासणी करतानाच २०० ते २५० लोकांचा जमाव गोरक्षक व पोलिसांवर धावून आला. गोरक्षक अमोल दाणे व कमलाकर खेरुड यांची दुचाकी बंद पडली. यामुळे काही जणांनी हत्यारांसह दाणे व खेरुड याच्या जमावाने वार केला. जखमींना उपजिल्हा रुग्णालय व गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त अपर पोलिस अधीक्षक तेजवीरसिंह संधू हल्ल्याच्या ठिकाणी दोन तास तळ ठोकून होते. तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, उपअधीक्षक बाजीराव महाजन, मनमाड पोलिस निरीक्षक विजय कऱ्हे, चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, सिन्नरचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड उपस्थित होते. आरोपींच्या शोधासाठी पथके पोलिस आणि गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्या जमावातील संशयितांच्या शोधासाठी पथक तयार केले आहेत. गोवंश हत्येला बंदी असताना छुप्या पद्धतीने हत्या सुरू आहे. गो रक्षकांनी यापूर्वीही शहरात होणारी गो तस्करी हाणून पाडली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. गोवंश हत्या झालेला परिसर पाण्याने धुऊन केली स्वच्छता गोरक्षकांनी पोलिसांना गोवंश हत्येची जागा सांगितली होती. त्या ठिकाणी आठवड्यातून रविवार, बुधवार व शुक्रवारी कत्तल केली जात असताना गो रक्षकांनी पोलिसांना माहिती देत कारवाईसाठी रविवारचा दिवस हाती घेतल्यानंतर गोवंश हत्येच्या ठिकाणी पाण्याने धुण्यात येऊन स्वच्छता करण्यात आली होती. रक्ताचा एकही थेंब नसताना एका खोलीतून गोरक्षक व पोलिस तपासणीनंतर एक व्यक्ती पिशवीत गोमांस घेऊन पळाला हे विशेष. एकाच्या डोक्यास १६ टाके दाणे यांच्या डोक्याला खोलवर जखम असून १३ टाके पडले आहेत. डोक्यावर हत्यारांनी वार झालेला असू शकतो. उजव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर आहे. खेरुड याच्या डोक्यावर १६ टाके घालण्यात आले आहे. त्यांच्याही जखमा खोलवर आहेत. दाणे याच्या डोक्याला ३ ठिकाणी टेंगूळ आले आहे. गोरक्षकांवर येवल्यात हल्ला झाल्यानंतर विंचूर चौफुलीवर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जमावाने हल्ला केल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत गोरक्षकांना उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर शहरातील गोरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. सकाळी ११ वाजता विंचूर चौफुलीवर रास्ता रोको करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पोलिसांची दमछाक झाली. खासगी रुग्णालयात गोरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. पोलिसांसमाेर गोरक्षकांवर हल्ला झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी या वेळी व्यक्त केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/WbM12ex
तणावाचे वातावरण, अपर पोलिस अधीक्षकांसह पोलिस उपअधीक्षक तळ ठोकून:येवल्यात पोलिसांसह गोरक्षकांवर दोनशे जणांचा दगड-हत्याराने हल्ला; 2 जखमी
April 20, 2025
0