Type Here to Get Search Results !

डीजीसीएच्या पत्रानंतर भाडेवाढ मागे, चार अतिरिक्त विमानांचीही सोय:विमान कंपन्यांकडून अडवणूक; श्रीनगर ते मुंबईचे भाडे केले तब्बल 55 हजार

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी विमान कंपन्यांनी संकटात संधी शोधण्याचा प्रयत्न केला. एरवी सरासरी ८ ते १५ हजारांपर्यंत असलेले श्रीनगर ते मुंबई विमान तिकीट बुधवारी तब्बल ५५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. या भाडेवाढीबद्दल नागरिकांनी सोशल मीडियात नाराजी व्यक्त करताच डीजीसीएने पत्र काढून सर्व विमान कंपन्यांना भाडेवाढ न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास कंपन्यांनी नियमित दरानेच तिकीट बुकिंग सुरू केले. श्रीनगरमधून मुंबईकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने काही खासगी विमान कंपन्यांची २३, २४, २५ आणि २६ एप्रिल रोजीची सर्व तिकिटे बुक झालेली आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर बहुतांश पर्यटकांनी पुढील पर्यटन सोडून तातडीने आपापल्या गावी परतण्याचे नियोजन केले. त्यामुळे विमानसेवेवरही ताण आला. अचानक श्रीनगर ते मुंबई बुकिंगसाठी पर्यटकांच्या उड्या पडू लागताच विमान कंपन्यांनीही अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली. दुपारपर्यंत विमान कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर सरासरी ४० ते ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रतिप्रवासी तिकीट दर होते. एका कंपनीने तर तब्बल ५५ हजार रुपये दर केला. याबाबत नागरिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करायला सुरुवात केली. त्यानंतर डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांसाठी एक पत्र जारी करत काही सूचना केल्या. त्यामध्ये भाडेवाढ करू नये, तसेच तिकीट रद्द किंवा रिशेड्युलिंगसाठी शुल्क आकारू नये, विमानांची उड्डाणे वाढवावीत, असे या पत्रामध्ये म्हटले. त्यानंतर विमान कंपन्या ताळ्यावर आल्या व भाडेवाढ मागे घेतली. मुंबईहून काश्मीरसाठी साडेचार हजार भाडे हल्ल्यानंतर काश्मीरला जाणाऱ्यांची संख्या घटली तर तिकडून मुंबईत येणाऱ्यांची प्रचंड वाढली. त्यामुळे आपसूकच विमान कंपन्यांनी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मुंबईतून श्रीनगरला जाण्यासाठी केवळ साडेचार हजार रुपयांपासून तिकीट दर ठेवले होते. याउलट श्रीनगरहून मुंबईला येण्यासाठी ६ ते १८ हजार रुपयांपर्यंतचे दर होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/9zuC0ej

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.