Type Here to Get Search Results !

इमारत तळ मजल्यासह पाच मजल्यांची असल्याची माहिती:मंत्रालयामध्ये नवीन इमारत; 15 मंत्र्यांना मिळणार विशेष केबिन

राज्य सरकारकडून मंत्रालय परिसरात मंत्र्यांसाठी नव्या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या इमारतीत राज्यातील १५ मंत्र्यांसाठी स्वतंत्र केबिन्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे मंत्र्यांना कार्यालयीन कामकाजासाठी मनपसंत जागा मिळवण्यासाठी होणाऱ्या अडचणींना आळा बसेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली. सध्या मंत्रालयात मुख्य व विस्तारित अशा दोन इमारती असूनही मंत्र्यांसह विविध विभागांसाठी जागेची कमतरता भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन नवीन इमारतीचे नियोजन करण्यात आले आहे. ही इमारत तळ मजला अधिक पाच मजल्यांची असेल. प्रत्येक मजल्यावर तीन मंत्र्यांसाठी केबिन असणार आहेत. त्यामुळे एकूण १५ मंत्र्यांना जागा उपलब्ध होईल. तर तळमजल्यावर इतर आवश्यक सुविधा असतील. या इमारतीचे काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण १०९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या नव्या इमारतीत कोणत्या मंत्र्यांना केबिन द्यायची, याचा निर्णय राज्य सरकारचा राजशिष्टाचार विभाग घेईल, असेही अधिकाऱ्यांनी दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले आहे. या इमारतीच्या बांधकामात प्री फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बीम आणि कॉलम आधीच तयार करून मंत्रालयात बसवले जातील. समुद्रकिनाऱ्यालगत मंत्रालय असल्याने, खाऱ्या पाण्यामुळे इमारतीला कोणतीही हानी होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. तसेच मंत्रालयाच्या इमारतीला सुमारे २०१२ मध्ये भीषण आग लागली होती. त्यावेळी ११ जण जखमी होऊन २ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही २०२० मध्ये मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती त्यात कोणालाही दुखापत झाली नव्हती. प्री- फॅब्रिकेटेड प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आगीपासून धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. एअर इंडिया इमारत ताब्यात नाही राज्य सरकारने नरिमन पॉइंट येथील २२ मजली एअर इंडिया इमारत १६०१ कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे ४६,४७० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली ही जागा सरकारी कार्यालयांसाठी वापरण्याचा प्रस्ताव होता. सरकारने ८ नोव्हेंबर २०२३ रोजी एअर इंडियाचे सर्व थकबाकी आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सरकारला अद्याप ही इमारत ताब्यात घेता आलेली नाही.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SWqtrfN

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.