Type Here to Get Search Results !

झाडाखाली थांबलेल्या 8 शेतमजुरांवर कोसळली वीज:दोघांचा मृत्यू, तर 6 जण गंभीर जखमी; लातूरमधील गोताळा येथील घटना

लातूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. लातूरमध्ये आजही मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसासोबत वीज कोसळून काही दुर्घटना घडत आहेत. अहमदपूर तालुक्यात सोमवारी दुपारी शेतात काम करणाऱ्या आठ शेतमजूरांवर वीज कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्दैवी घटना अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात दुपारच्या सुमारास घडली. शेतात मान्सून पूर्व मशागतीची कामे आणि शेंगा वेचण्यासाठी मजूर शेतात गेले होते. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी आठ शेतमजूर एका झाडाखाली थांबले. त्याचवेळी त्या झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी मजुरांची विचारपूस केली आणि तातडीने सर्वांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचे आदेश दिले. दरम्यान, जिल्ह्यातील मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा या प्रमुख नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये, लातूर जवळील, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. हे ही वाचा... मुख्यमंत्र्यांनी घेतला स्थितीचा आढावा:संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना; वाचा मुसळधार पावसामुळे कुठे काय घडले? मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी या प्रकरणी स्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या ठिकाणी नुकसान झाले, तिथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री यासंबंधी राज्याच्या मुख्य सचिव तथा राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी सातत्याने संपर्कात आहेत. पूर्ण बातमी वाचा... पुणे जिल्ह्यात पावसाने दाणादाण:बारामती, इंदापुरात दिवसभरात 13 इंच पाऊस; मेमध्ये 100 वर्षांत पहिल्यांदाच एवढा पाऊस -अजित पवार पुणे - मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुण्यासह बारामतीत अक्षरशः दाणादाण उडाली आहे. मीरा डावा कालवा फुटल्यामुळे कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या घरांत शिरले. त्यात शेतीचेही मोठे नुकसान झाले. इंदापुरातही एका दिवसात तब्बल 13 इंच पाऊस झाला. हे पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे 6 च्या सुमारास घराबाहेर पडत स्थितीची पाहणी सुरू केली. वाचा सविस्तर मुंबईसाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट:मंत्रालय परिसरात गुडघाभर पाणी, अरबी समुद्राला उधाण; चाकरमान्यांची पुरती दैना मुंबई - मागील 24 तासांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस झोडपत आहे. यामुळे शहरात विविध ठिकाणी 7-8 किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. काळ्याकुट्ट ढगांमुळे मुंबईतील दृश्यमानता खूपच कमी झाली आहे. त्याचा फटका हवाई सेवेला बसला आहे. वाचा सविस्तर

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/D0KvFrR

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.