आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेट अनौपचारिक असल्याचे सांगितले असले तरी शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसांतील वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी पवार आघाडीतून बाहेर पडले तरी भविष्यात आघाडीची वीण भक्कम राहावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवण्याच्या दृष्टीने सपकाळ आणि ठाकरे यांच्यात बऱ्याच चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या एकत्र बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षात सगळे आलबेल ठेवण्याच्या दृष्टीने सपकाळ यांनी पाहिले पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसची मुंबईत फार ताकद नसली तरी शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेत सत्तेत सहभागी व्हायचे आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीतून ऐनवेळी बाहेर पडला तरी काँग्रेसकडून शिवसेना आणि इतर मित्रपक्षांची महाविकास आघाडी कशी कायम राहील असा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जात आहे. भाजपविरोधात पक्षांसोबत- काँग्रेस भाजप महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजप संपवत आहे. त्याचे रक्षण करण्याचे काम मविआ व इंडिया आघाडी करत आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/aVmZb4G
पवार यांचे तळ्यात - मळ्यात; मनपासाठी काँग्रेस-उबाठात चर्चा:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली ठाकरेंची भेट
May 16, 2025
0