Type Here to Get Search Results !

संभाजीनगर येथील शिवाजीनगर भुयारी मार्ग पहिल्याच पावसात बंद:नागरिकांची गैरसोय, पाणी साचल्याने नाराजी; पाहा स्थानिकांच्या प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरातील भुयारी मार्ग काल झालेल्या पावसात पार तुडुंब भरला होता. या भुयारी मार्गाला सुरू होऊन केवळ 3 महिनेच उलटले आहेत. त्यातही पहिल्याच पावसात या भुयारी मार्गावर पाणी साचले. त्यानंतर परिसरात रहदारी झाली आणि स्थानिकांची तसेच वाहतुकीचीही गैरसोय झाली. काही लोक तर त्या साचलेल्या पाण्यातूनच चालत येतांना दिसले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी साचल्यानंतर ये-जा करतांना काहीजण पडलेत. त्यांना दुखापत झाल्याचेही त्यांनी सांगितले. जवळपास 18 महिने या पुलाचे काम सुरू होते. हे काम सुरू असतांना याचा तेथील व्यवसायावरही परिणाम झाला. त्या परिसरातील आसपासचे दुकानदार तेथून स्थलांतरित झाले. सोबतच बीड बायपासला जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत होता. असे असूनही हा भुयारी मार्ग जर पहिल्याच पावसात तुंबायला लागला असेल तर आमची परिस्थिती जैसे थी... अशीच झालेली असल्याचेही नागरिकांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले. दिव्य मराठीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तेथील परिस्थिती आणि नागरिकांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या... स्थानिकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा.... नागरिक म्हणाले की, दुपारच्या सुमारास पाऊस पडला असून आता जवळपास 4 तास उलटले आहेत. तरीदेखील या ठिकाणी प्रशासन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले नाही. त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडीदेखील बऱ्याच वेळापासून उभी होती. पण प्रत्यक्षात तेथील पाणी बाहेर काढण्याचे काम मात्र सुरू नव्हते. काही वेळाने एक जेसीबी तिथे आला आणि तोदेखील लगेच तिथून निघून गेला. या दरम्यान, लोक पाण्यातूनच ये-जा करत होते. दुचाकी, चारचाकी या पाण्यातून बाहेर काढतांना दिसले. तसेच काही लोक तर पायी पाण्यातून वाट काढत बाहेर येतांना दिसले. एकत्रित या सर्व परिस्थितीवर स्थानिकांचा रोष दिसून येत होता. त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. प्रशासनाकडून मदतीसाठी होत असलेल्या विलंबावरही त्यांनी संताप व्यक्त केला. शिवाजीनगर भुयारी मार्गावर पाणी साचल्याचे फोटो... भुयारी मार्गाशी संबंधित या बाबीही जाणून घ्या... काही महिन्यांपूर्वीच झाले होते उद्घाटन भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी यावर संताप व्यक्त केला. या भुयारी मार्गाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात ही सुविधा निकामी ठरल्याचे चित्र दिसले. तब्बल 6 महिने काम लांबले दरम्यान, या भूयारी मार्गाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) लाइनमुळे सहा महिने काम लांबले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा मार्ग सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसात तो बंद पडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 2010-2011 मध्ये सुरू झाला उड्डाणपुलाचा लढा 2010-2011 मध्ये उड्डाणपुलाचा लढा सुरू झाला होता. 2011-2012 मध्ये सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती स्थापन करण्यात आली. 2013-2014 मध्ये उड्डाणपूल होणार नाही, असे कळल्यानंतर भुयारी मार्गाची मागणी सुरू झाली. त्यानंतर 2017 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. 2021 मध्ये उच्च न्यायालयात याचिकेवर 25 सुनावण्या झाल्या. त्यानंतर निकाल देत चार विभागांची समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना 30 निवेदने देण्यात आली होती. तसेच, नागरिकांची 15 पेक्षा अधिक आंदोलने झाली होती. 200 मीटर लांबीचा भुयारी मार्ग शिवाजी नगर परिसरातील 200 मीटर लांबीचा हा रेल्वे भुयारी मार्ग आहे. यामध्ये 3.5 मीटर मार्गाची उंची आहे. या मार्गासाठी 11.47 कोटी निधी खर्च झाला. 15 ऑक्टोबर 2023 ते 15 ॲाक्टोबर 2024 प्रकल्पाचे काम वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, 6 महिने काम रखडल्याने हा मार्ग खुला होण्यासाठी 18 महिने लागले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PCN8Q5I

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.