Type Here to Get Search Results !

राज्याचे 'एकात्मिक पार्किंग धोरण' लवकर आणणार:परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती, मुंबई महानगर प्रदेशात सुरुवातीची अंमलबजावणी

वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी "एकात्मिक पार्किंग धोरण "आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मध्ये केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात बोलावण्यात आलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महापालिका आयुक्तांच्या बैठकीत ते बोलत होते. सोमवारी मुंबईत झालेल्या या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव (वाहतूक) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आणि एमएमआरडीएचे सर्व महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते. महापालिका आयुक्तांच्या सूचना मागवल्या मंत्री सरनाईक म्हणाले, एकात्मिक पार्किंग धोरण आणण्या अगोदर त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये या समस्याने उग्र रूप धारण केले आहे, त्या महापालिका आयुक्तांच्या सूचना, अभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल, तर ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये प्रभावीपणे राबवावे असे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले आहे, त्यानुसार ही बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा येणाऱ्या पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईल असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलिस प्रशासन व मोटार परिवहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोइंग करून हलवण्यात यावीत, रस्ते मोकळे करावेत. तसेच विकास आणि सुविधा साठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर महापालिकांनी स्विकारावी जेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईल, असेही सरनाईक म्हणाले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/sP34uGw

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.