Type Here to Get Search Results !

खडकवासला धरणातून 15 हजार क्युसेकने विसर्ग सुरू:प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, उद्या पुण्याला ऑरेंज अलर्ट

पुणे शहरात गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून, धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आला आहे. सध्या 15 हजार क्युसेकने विसर्ग सुरू असून, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अगोदर धरणातून 2 हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते. मात्र, धरण परिसरात सतत पाऊस सुरू असल्यामुळे विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली आहे. हवामान विभागाने शुक्रवारी पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे, त्यामुळे पुढील 24 तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात होत आहे. इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ मुसळधार पावसामुळे आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत इंद्रायणी नदीचे पाणी पोहोचले आहे. मंदिरात जाण्यासाठी भक्तिसोपान पुलाचा वापर केला जातो. मात्र आजचा पावसाचा जोरच एवढा आहे, की या पुलाचे रेलिंग तुटून वाहून गेले आहे. त्यामुळे मंदिरात पोहोचण्यासाठी वारकरी पाण्यातून वाट काढून जात आहेत. रायगडमध्ये धुवांधार पाऊस, जगबुडीने इशारा पातळी ओलांडली रायगडच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. या नदीचे पाणी शहरातील मटण मार्केटमध्ये शिरले होते. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर स्थिती बिघडून हे पाणी मुख्य मार्केटमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन या प्रकरणी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. खेड नगरपरिषदेने नागरिकांना सतर्कतेची सूचना दिली आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडीच नव्हे तर नारंगी नदीलाही पूर आला आहे. यामुळे खेड शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेलेत. घाटमाथ्यावरील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे नागोठणे शहरातील रस्तेही जलमय झालेत. येथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. महाबळेश्वरमध्ये दरड कोसळून रस्ता खचला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर -तापोळा रस्त्यावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. यामुळे अवघ्या काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला आहे. रस्ता खचल्याने महाबळेश्वरहून तापोळ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या भागात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला आहे. पण इथे अद्याप संततधार कायम आहे. कोयना धरणात 9 हजार क्युसेक वेगाने पाणी येत असून, धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 26 टीएमसीपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला नाशिक जिल्ह्यातही सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड व गोदा घाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RxGDHrC

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.