कुंभमेळ्यासाठी २५ काेटी भाविकांची व्यवस्था करणार तसेच केवळ सिंहस्थातच नव्हे तर गाेदावरी बारमाही प्रवाही राहील, यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे कुंभमेळा व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘दहा दिवस दहा मंत्री’ या विशेष उपक्रमात उपस्थित राहून त्यांनी शहरातील साधू-महंत, पुराेहित, डाॅक्टर, व्यावसायिक व मान्यवरांशी साधलेला हा संवाद... कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहित करणार दर १२ वर्षांनी नाशिकमध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थात साधू-महंतांसाठी तपाेवन परिसरात साधूग्राम उभारण्यात येते.यापूर्वी शासनाकडून या परिसरातील शेतकऱ्यांकडून जमिनी भाडेतत्त्वावर घेण्यात येत हाेत्या. मात्र कुंभमेळ्यासाठी आता कायमस्वरूपी जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आगामी दाेन-तीन महिन्यांत याबाबत निर्णय हाेऊन जमीनमालक असलेल्या शेतकऱ्यांना याेग्य माेबदला देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर दाेन लेन वाढविणार प्रयागराजला ६५ काेटी भाविकांनी अमृतस्नान केले. लाेकांमध्ये वाढलेली धार्मिकता तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरला गेल्या वर्षीपेक्षा चारपट अर्थात २० ते २५ काेटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या भाविकांना गाेदावरीत स्नानासाठी निर्मल व स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने तसेच गाेदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा याचसाठी राज्य सरकारने विशेष नियाेजन केले आहे. गंगापूर धरणासह परिसरातील अन्य धरणांतून पाणी पंपिंग करून गाेदावरी नदीत साेडून ती बारमाही प्रवाहित ठेवण्यात येणार असल्याची घाेषणा जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ‘दिव्य मराठी’च्या व्यासपीठावर केली. जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर दाेन लेन वाढविणार प्रयागराजच्या तुलनेत त्र्यंबकेश्वर-नाशिकमध्ये जागा छाेटी आहे. मात्र सिंहस्थादरम्यान येणाऱ्या भाविकांची संख्या काेट्यवधी असणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियाेजन करणे हे राज्य सरकार, स्थानिक प्रशासन यांच्यासमाेर एक माेठे आव्हान असेल. मात्र पूर्ण ताकदीने सिंहस्थाचे नियाेजन केले जाईल. निधीसाठी एक रुपयाही कमी पडू देणार नाही. ‘१४४ वर्षांनंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ’ असे प्रयागराजच्या कुंभाचे ब्रँडिंग करण्यात आले. यामुळे देशातून नव्हे तर जगभरातून भाविकांनी प्रयागराज येथे स्नानासाठी गर्दी केली हाेती. त्यातून झालेली चेंगराचेंगरीची दुर्घटना आणि वाहतूक काेंडीची समस्या याचा विचार करता नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्याचे नियाेजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिक हा महत्त्वपूर्ण रस्ता सहापदरी क्राँकिटीकरणाचा करण्यात येणार आहे. याचबराेबर शहराला जाेडणाऱ्या विविध मार्गांवरील रस्त्यांची लांबीदेखील वाढविण्यात येणार आहे. आता वेळ कमी असल्याने नव्या रस्त्यांची निर्मिती करणे अवघड ठरेल. मात्र, जे रस्ते आहे तेच वाढविण्याचे नियाेजन असेल. जे रस्ते चारपदरी आहे ते सहापदरी, जे सहापदरी आहे ते आठपदरी करण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियाेजन आणि सुसूत्रता यासाठी ते सर्वाधिक उपयुक्त ठरेल. डाॅ. शीतलकुमार हिरण, हृदयराेगतज्ज्ञ, प्रश्न : सिंहस्थाला काेट्यवधी भाविक येतील. त्यामुळे शासकीय आराेग्य यंत्रणेवर ताण येईल. याबाबत काय नियाेजन? गिरीश महाजन यांचे उत्तर : कुंभमेळ्यातील भाविकांच्या सुरक्षिततेवर, आराेग्यावर देखील शासनाच्या वतीने विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. शासकीयबराेबरच खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या डाॅक्टरांना शासनाने कुंभासाठी सामावून घेत त्यांच्या मदतीने आराेग्य सुविधेवर लक्ष केंद्रित करणार आहे. महंत भक्तिचरणदास, समन्वयक, कुंभमेळा, प्रश्न : देशभरातून येणाऱ्या साधू-महंतांची कशी व्यवस्था असणार? त्यांच्या साेयी-सुविधांबाबत काय करणार? उत्तर : नाशिक-त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येणाऱ्या साधूग्रामसाठी शासनाकडून कायमस्वरूपी जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. अमृतस्नान व पर्वस्नानांसाठी साधू-महंतांच्या सूचनांनुसार नियाेजन केले जाईल. शासनाकडून कुंभमेळ्यासाठी एक रुपयाही निधी कमी पडू दिला जाणार नाही. सुनील गवादे, नरेडकाे, प्रश्न : कुंभमेळ्यादरम्यान वाहतूक काेंडीची समस्या निर्माण हाेण्याचा धाेका आहे, त्याचे निराकरण कसे करणार? उत्तर : त्र्यंबकेश्वर-नाशिकमध्ये सिंहस्थादरम्यान माेठ्या संख्येने भाविक येणार आहेत. या भाविकांच्या गर्दीच्या नियाेजनासाठी रस्ते, रिंगराेड वाढविल्यास वाहतूक काेंडीची समस्या सुटण्यास मदत हाेणार आहे. याबराेबरच शहरातील प्रत्येक घटक व सर्व संस्थांना या साेहळ्यात प्रशासन सहभागी करून घेईल. कृणाल पाटील, क्रेडाईचे माजी अध्यक्ष, प्रश्न : सिंहस्थ ही नाशिकला जागतिक स्तरावर नेण्यासाठी माेठी संधी आहे. त्याच्या ब्रँडिंगसाठी काय करणार आहे? उत्तर : त्र्यंबकेश्वर-नाशिकचे ब्रँडिंग करण्यासाठी एक खास लाेगाे तयार करावा तसेच राज्यभरात शासनासह सर्व खासगी संस्थांनी सिंहस्थाचे ब्रँडिंग करावे. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिक जागतिक स्तरावर तर पाेहाेचेल. पण नाशिकचे धार्मिक पर्यटनस्थान म्हणून महत्त्व अधाेरेखित केले जाईल. यावर काम सुरू आहे. डाॅ. राज नगरकर, कॅन्सर उपचारतज्ज्ञ, प्रश्न : शहरात विविध स्पेशालिटी हाॅस्पिटल्स आहेत. त्यांचा वापर कुंभमेळ्यात आराेग्यसेवा देण्यासाठी कसा करता येईल? उत्तर : आराेग्य यंत्रणेचे सर्वात महत्त्वपू्र्ण काम असणार आहे. सर्वच वैद्यकीय सुविधा, उपचार एकाच रुग्णालयात उपलब्ध करून दिली तर ते थाेडे अडचणीचे हाेईल म्हणून शहरातील सर्व हाॅस्पिटलचा आढावा घेत त्यातील सुविधा, बेड्स उपलब्धता याचा विचार करून भाविकांसाठी हाॅस्पिटलचे वर्गीकरण करण्याच्या दृष्टीने नियाेजन करण्यात येईल. समाधान जेजूरकर, साधूग्राम परिसरातील जमीनमालक, प्रश्न : साधूग्रामसाठी जमिनी देऊनही माेबदला मिळालेला नाही, त्याबाबत जमीनमालकांची नाराजी कशी दूर करणार? उत्तर : २००३ सालच्या कुंंभासाठी दिलेल्या जागेचे अद्याप जमीनमालकांना पैसे मिळालेले नाही हे खरे आहे. मात्र यंदा असा त्रास हाेणार नाही. साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहित करण्याचा शासननिर्णय आहे. यात जमीनमालकांचे आर्थिक नुकसान हाेणार नाही याची शासनाकडून काळजी घेतली जाईल. माधवदास राठी महाराज, प्रश्न : १५ किमी परिसरात मांस, मद्य विक्री बंदी करावी, अशी साधू-महंतांची मागणी आहे. उत्तर : त्र्यंबकेश्वर ‘अ’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घाेषित करण्यात आलेले आहे. तसेच नाशिकला देखील विशेष धार्मिक महत्त्व आहे. याचा विचार करता साधू-महंतांसह भाविकांच्या मांस व मद्य विक्री बंद करण्याच्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल. सतीश शुक्ल, पुराेहित, नाशिक, प्रश्न : सिंहस्थादरम्यान भाविकांच्या राहण्याची माेठी गैरसाेय हाेत असते, त्यासाठी काय व्यवस्था करण्यात येईल? उत्तर : सिंहस्थादरम्यान येणाऱ्या भाविकांची संख्या माेठी असते. सर्वच भाविकांकडून निवासाबाबत विचारणा हाेते. हाॅटेलमध्ये वाढलेल्या दरामुळे भाविकांना माेठी आर्थिक झळ बसते. ही आर्थिक लूट थांबविण्यासाठी शहरातील धर्मादाय आयुक्ताकडे नाेंद असलेल्या सर्व धर्मशाळांचे अधिग्रहण करण्यात येईल. संजय चव्हाण, आभार संस्थेचे अध्यक्ष, प्रश्न : देश-विदेशातील भाविकांसाठी २४ तास कॅफे, हाॅटेल सुरू ठेवण्यास परवानगी मिळेल का? उत्तर : देशासह विदेशातून भाविक सिंहस्थासाठी शहरात दाखल हाेणार आहेत. या भाविकांची निवासासह जेवणाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने सिंहस्थादरम्यान काॅफी कॅफे तसेच हाॅटेल सुरू ठेवण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल. बॅरिकेडिंगमुळे भाविकांची गैरसाेय हाेऊ नये या दृष्टीनेदेखील अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4YzWqeH
‘कुंभ’मध्ये भाविकांची लूट टाळण्यासाठी रिकामे फ्लॅट देण्याच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार:‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना गिरीश महाजन यांची ग्वाही
June 14, 2025
0